वाई : विरोधकांनी आपल्या तालुक्यातील संस्थांची वाट लावली. सगळी पापे यांनी केली आणि आता त्यांच्या पापाचे भोग मी निस्तरतोय. त्यांनी वाट लावलेल्या संस्था आम्ही दुरुस्त करतोय, असा हल्लाबोल महायुतीचे वाई, खंडाळा व महाबळेश्वर मतदारसंघाचे उमेदवार आ. मकरंद पाटील यांनी केले.
बावधन गटातील अनपटवाडी येथील आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी किसनवीरचे संचालक दिलीप पिसाळ, मदन भोसले, विक्रम वाघ, सरपंच अमृता गोळे, अश्विनी मांढरे, तानाजी कचरे, सतीश कांबळे, पोपट पिसाळ, अनिल अनपट, नितीन मांढरे, वसंत अनपट, अजित पसिाळ, नवनाथ भोसले, संतोष राजेभोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. मकरंद पाटील म्हणाले, किसनवीर कारखान्यांवर जप्ती आली होती. 9 बँकांचे कर्ज होते; पण चांगल्या कामाच्या पाठीशी परमेश्वर असतो. 467 कोटी रुपये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मिळाले. ऊस उत्पादक सभासदांना 3000 दर दिला. स्व. अप्पांनी जी सूतगिरणी उभी केली ती बंद होती. उद्योगपती व व्यापारी आणून ती सूतगिरणी चालू केली. विरोधक म्हणतात कोणती संस्था उभी केली? पापं कुणी केली? फेडतो आहे मी. पूर्वीची मार्केट कमिटीची अवस्था बघा, पूर्ण तोट्यात होती. माझ्याकडे आली आणि यावर्षीचा फायदा 80 लाख रुपये आहे. मी ज्या ज्या संस्था ताब्यात घेतल्या समर्थपणे चालवल्या. ज्या ज्या गावांची मागणी आली त्या त्या गावामधे मी विकासकामे करत असतो. माझ्या तोंडून नाही हा शब्द कधी येत नाय. सर्वांगीण विकासात्मक मतदारसंघ बांधण्याचा मी प्रयत्न केलाय, असेही आ. पाटील म्हणाले. यावेळी नितीन मांढरे यांनी मनोगत व्यक्त केले.
विरोधकांच्या भ्रष्टाचारामुळेच जनतेने संस्था आमच्याकडे सोपवल्या
विरोधक म्हणतात यांच्याच घरात सत्ता असल्याने यांच्याकडेच सर्व संस्था. पण विरोधकांनी या संस्था माझ्या ताब्यात येण्यापूर्वी त्यांची काय अवस्था होती? याचा विचार केला नाही. किसनवीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने, वाईची सूतगिरणी, वाई बाजार समिती या संस्था पूर्वी तोट्यात होत्या. त्यातील सूतगिरणी व बाजार समिती फायद्यात येवू लागली आहे. विरोधकांनी संस्थेत भ्रष्टाचारी कारभार केल्यानेच जनतेनेच या संस्था आमच्या ताब्यात दिल्या. तुम्ही संस्था सांभाळल्या असत्या तर तुमची पाप निस्तरावी लागली नसती, असा टोलाही आ. पाटील यांनी लगावला.