अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात

गावनिहाय भेटींनी मतदारराजा मध्ये चैतन्य शिवसैनिकांची अथक साथ

by Team Satara Today | published on : 06 November 2024


सातारा : महाविकास आघाडी तसेच मित्र पक्षाचे उमेदवार अमित दादा कदम यांनी प्रचारानिमित्त काढलेल्या शिवसंवाद यात्रेची परळी खोऱ्यामध्ये चांगलीच चर्चा आहे.  गेल्या चार दिवसापासून सकाळी सातारा आणि संध्याकाळी जावली अशा दोन सत्रांमध्ये सुरू असलेल्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाव पातळीवरील मध्यवर्ती ठिकाणावर ग्रामस्थांच्या गाठीभेटी त्यातून समस्यांचा आढावा आणि परिवर्तनाचा आश्वासक शब्द देत अमित दादा कदम यांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे.

बुधवारी सातारा शहराच्या पूर्व भाग शाहूनगर गोडोली जगतापवाडी येथून शिवसंवाद यात्रा थेट परळी खोऱ्याकडे रवाना झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सागर रायते, यांच्यासह प्रणव सावंत, बाळासाहेब शिंदे, यांनी परळी खोऱ्यातील पोगरवाडी, गजवडी, बोरणे, राजापुरी, रेवंडे, वावदरे, पांगारे, ठोसेघर, चाळकेवाडी,  चिखली, जांभे व मायणी या बारा गावांना भेटी देऊन परळीचा एक तृतीयांश भाग पिंजून काढला. परळी खोऱ्यातील ही अमित दादांची दुसरी फेरी आहे या गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न अमित कदम समजावून घेत आहेत. गाव भागात जाणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा, सिंचनाचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न याशिवाय खोऱ्याच्या दुर्गमतेमुळे साधन सुविधांचा आणि संसाधनांचा अभाव हे प्रश्न चर्चेतून समोर येत आहेत. गुरुवारी तब्बल साडेसहा तास झालेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये प्रचार दौऱ्यांमध्ये अमित कदम यांनी परळी खोऱ्यातील ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधत आपल्या मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून दिली. तसेच या खोऱ्यातील नागरिकांनी धरणांच्या निमित्ताने जो त्याग केलेला आहे, त्या तुलनेने त्यांच्या पुनर्वसन प्रक्रिया रखडलेले आहेत त्या सुद्धा पाठपुरावा करण्याचा शब्द अमित कदम यांनी दिला आहे.

सातारा शहर हद्दवाढ भाग आणि परळी खोऱ्याचा ग्रामीण भाग अशी तब्बल 11 तासाची पदयात्रा काढून अमित कदम यांचा शिवसंवाद यात्रेचा झंजावात सुरू आहे. कोणताही तामझाम नाही गाड्यांची किंवा कार्यकर्त्यांची गर्दी नाही, भगवे उपरणे घातलेले मोजके शिवसैनिक आणि अमित दादा समर्थक त्यांचे स्नेही जन या शिवसंवाद यात्रेत सहभागी होऊन परळीचा सारा परिसर पालथा घालत आहेत. बुधवारी सकाळी जगतापवाडी शिवनेरी कॉलनी तसेच मंगळाई देवी परिसर गोडोली भाग हा अमित कदम यांनी पिंजून काढत येथील समस्या जाणून घेतल्या या भागांमध्ये पायाभूत सुविधांची असलेली उणीव त्यांना प्रकर्षाने जाणवली. या पायाभूत सुविधांसाठी निश्चित प्रयत्न करू असा शब्द त्यांनी दिला आहे दररोजच्या पदयात्रेमध्ये अमित कदम हे सरासरी 25 ते 27 किलोमीटर चालत आहेत घरटी संवादामुळे आणि त्याला मिळालेली शिवसैनिकांची साथ यामुळे परिवर्तनाची मशाल पेटणार अशी चर्चा सुरू झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बांदीपोरामध्ये लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा
पुढील बातमी
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा

संबंधित बातम्या