'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु

याशनी नागराजन यांची माहिती

by Team Satara Today | published on : 19 December 2024


सातारा : सातारा जिल्ह्यातील पाचशे गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या तीस हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, लघु पाटबंधारे, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, कृषी, ग्रामपंचायत आदी विभागाच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण योजना राबवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद आपल्या दारी असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी चांगले काम करत आहेत. विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर त्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी विश्वास सिद, उपमुख्याधिकारी निलेश घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने, पाटबंधारेचे अभियंता अरुणकुमार दिलपाक आदी उपस्थित होते.याशनी नागराजन म्हणाल्या, शिक्षण विभागाच्या माध्यमातून स्मार्ट शाळा हा उपक्रम हाती घेतला आहे. अधिवेशनानंतर तीन स्मार्ट शाळांचे उद्घाटन घेण्यात येणार आहे. त्या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्येक महिन्याला टेस्ट घेतली जात आहे. त्यांच्यामध्ये दर्जेदार शिक्षण कसे देता, येईल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर इस्त्रोची सहल यावर्षीही काढण्यात येणार आहे. खेलो इंडियामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश करुन घेतला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग शिक्षण देण्याची सुविधा केली आहे. तसेच डे केअर सेंटरची सुविधा करत आहोत. त्याचबरोबर महिला व बालकल्याणच्या माध्यमातून १00 अंगणवाड्या मॉडेल स्कूल करत आहोत. त्या अंगणवाड्याच्या इमारतीही युनिसेफच्या डिझाईननुसार करण्यात येणार आहेत. चांगल्या सुविधा अंगणवाड्यांना दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर मिशन धारावू हे ही पुन्हा सुरु करणार आहोत. आरोग्य विभागाच्यावतीने स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे केली जात आहेत. आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांच्या हजेरीच्या ज्या काही तक्रारी येत आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिओ फेसिंग अटेंडन्स सुरु करत आहोत. तसेच मिशन तेजस्विनी या उपक्रमातंर्गत ७0 हजार महिलांचे स्क्रिनींग करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अतिशय क्रिटीकल असेल तर टाटा रुग्णालयाशी करार करुन तेथे उपचार करण्याची सुविधा केली आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने ही चांगले काम सुरु आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल याकरता नाविण्यपूर्ण योजना राखबवण्यात येत आहेत. उमेद अभियनाच्या माध्यमातून महिला बचतगटाच्या अर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार म्हणाले, पशुसंवर्धन विभाग हा आतापर्यंत जनावर आजारी पडले की उपचार करणे एवढ्यापुरता सीमीत होता. तो यापुढे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. जनावरे वंध्यत्व शिबीरासह गोचीडसाठी औषध फवारणी हाती घेण्यात येणार आहे. जनावरांचा खाद्याचा खर्च मोठा आहे. त्यामुळे तो घरच्या घरीच खादद्य तयार करण्यासाठी मका पेरणीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यामाध्यमातून मुरघास निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. दूध उत्पादन वाढीसाठी सातारा जिल्ह्यातील २४ गावांची निवड करण्यात आली आहे.जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रोहिणी ढवळे म्हणाल्या की, अंगणवाडी बांधकामसाठी चालू वर्षी मॉडेल अंगणवाडी बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी १५ लक्ष २५ हजार रुपयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात यावर्षी ९८ अंगणवाडीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या अंगणवाडीमध्ये टाकाउपासून टिकावूचे खेळणे मुलांसाठी देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांसाठी रोजगार मेळावेही घेण्यात येणार आहेत.ग्रामीण भागाच्या मुलभूत सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी झेडपीतील सर्व विभागप्रमुख हे गावपातळीवर जावून नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेवून त्या सोडविणार आहेत. हर घर जल ही केंद्र सरकारची योजना आहे. ती प्रभावीपणे राबविण्यासाठी झेडपी प्रयत्नशील आहे. यासाठी नव्याने ७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत ज्या ठेकेदाराने मुदतीत काम केले नाही, अशा ठेकेदारांना पाच लाखाचा दंड करण्यात आला आहे. त्यामुळे जलजीवन मिशन योजना ही प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे सीईओ याशनी नागराजन यांनी सांगितले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त : प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

संबंधित बातम्या