पक्षाने टाकलेला विश्वास सक्षमतेने सार्थ ठरवणार

नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे प्रतिपादन

by Team Satara Today | published on : 22 July 2023


सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये भाजप हा नंबर एकचा पक्ष बनलेला आहे. जिल्हाध्यक्ष पदाची उंची यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी अत्यंत तळमळीने काम करून वाढवलेली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर प्रदेश कार्यकारिणीने जी जबाबदारी टाकलेली आहे. त्या विश्वासास मी निश्चित पात्र ठरून पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार आहे. जिल्ह्याच्या राजकीय वाटचालीमध्ये सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले.
सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर झाल्यानंतर कदम यांचे प्रथमच आगमन झाल्यानंतर शिरवळ खंडाळा सातारा येथे ठीक ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत झाले . येथील हॉटेल लेक व्ह्यू च्या दालनात धैर्यशील कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, प्रदेश कार्यकारणी उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, प्रदेश कार्यकारणी सदस्य गीतांजली कदम, रंजना रावत, दत्ताजी थोरात यावेळी उपस्थित होते.
धैर्यशील कदम पुढे म्हणाले, माझ्या कुटुंबाला कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. गेल्या 30 वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपच्या वरिष्ठांनी मोठा विश्वास टाकला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करून भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वसमावेशकतेने मी काम करेल. सध्याचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. रायगड येथे झालेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे स्वतः घटनास्थळापर्यंत चालत गेले. या दुर्घटनेचे व्यवस्थापन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नियंत्रण कक्षातून केले. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये निर्णय प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व भाजपच्या सर्व सदस्यांना सामावून घेत काम करणार असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले.
आमदार जयकुमार गोरे बोलताना म्हणाले, गेल्या वर्षभराच्या वाटचालीमध्ये मला भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्षपदावर काम करण्याची जी संधी दिली आणि जिल्ह्यातील ज्या सदस्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केले अशा सर्व सदस्यांचे मी आभार मानतो. सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आम्ही कार्यकर्ता म्हणून पार पाडणार आहे. जिथे जिथे माझी गरज पक्षाला पडेल त्या-त्या वेळी मी उपलब्ध असणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सुद्धा धैर्यशील कदम यांच्या आगामी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. आमदार जयकुमार गोरे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याकडून पक्षाचे काम अत्यंत सक्षमतेने होईल. भाजप हा जिल्ह्यात नव्हे तर देशातही नंबर एकचा पक्ष बनलेला आहे. विरोधकांना उत्तर देताना भाजपचे सर्वसामान्यांसाठी अभिप्रेत असलेले कार्यक्रम हेच त्यांना उत्तर असेल, असा आशावाद रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे जिल्हयात जंगी स्वागत
कराड उत्तरचे भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशील कदम यांची सातारा जिल्हा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. शनिवारी त्यांचे सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे मुंबईवरून शनिवारी सातारा जिल्हयात आले असताना त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. शिरवळ येथे निरा नदीकाठी तसेच खंडाळा येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. कवठे, ता. वाई येथील देशभक्त किसनवीर आबा यांच्या पुतळ्यास धैर्यशील कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्याची आतषबाजी करत त्यांचे स्वागत केले.
धैर्यशील कदम यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन केले. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले. यावेळी हलगी, तुताऱ्यांच्या निनादासह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज कि जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, राहुल शिवनामे, पंकज चव्हाण आदी पदाधिकरी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कळंबे ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे
पुढील बातमी
कोल्हापूर परिक्षेत्राच्या कर्तव्य मेळाव्यात सातारा पोलिसांना जनरल चॅम्पियनशिप

संबंधित बातम्या