भारत जगातील सर्वात मोठा AI हब बनणार

गुगल करणार 1.33 लाख कोटींची गुंतवणूक

by Team Satara Today | published on : 14 October 2025


सध्या एआयचा काळ आहे, आगामी काळात एआयचा वापर आणखी वाढणार आहे. अशातच आता जगातील आघाडीची टेक कंपना गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, ‘भारताला एआय हब बनवण्यासाठी कंपनी भारतात 1.33 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.’ याबाबत पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केली आहे.

गुगल आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनममध्ये हे एआय हब उभारणार आहे. हे हब अमेरिकेबाहेरील कंपनीचे सर्वात मोठे हब असणार आहे. यासाठी गूगल पुढील पाच वर्षांमध्ये भारतात 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. याबाबत पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली असून हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे विधान सुंदर पिचाई यांनी केले आहे.

देशाच्या विकासाला गती मिळणर – पिचाई

मुळचे भारतीय वंशाचे असणारे सुंदर पिचाई यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून आनंद झाला. आम्ही त्यांनी विशाखापट्टनममध्ये एआय हब तयार करण्याची आमची योजना सांगितली, जे एक ऐतिहासिक पाऊल असणार आहे. या हबमध्ये गीगावॅट संगणकीय क्षमता आणि मोठ्या प्रमाणातील ऊर्जा पायाभूत सुविधांना एकत्र आणणार आहे. आम्ही आमचे उद्योग आणि तंत्रज्ञान भारतीय यूजर्सपर्यंत पोहोचवू, यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल.

अनेक मंत्री एकाच मंचावर

दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या Bharat AI Shakti या कार्यक्रमात भारत सरकारचे अनेक मंत्री एकाच मंचावर आले असल्याचे दिसून आले. याच कार्यक्रमात क्लाऊडचे सीईओ थॉमस कुरियन यांनी म्हटले की, ‘हे अमेरिकेच्या बाहेरील सर्वात मोठे हब असेल, ज्यात आम्ही गुंतवणूक करणार आहोत.’ या कार्यक्रमात या हबच्या संभावित करारावर सह्याही करण्यात आल्या. हा करार गुगल आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये झाला आहे. यानंतर आता सुंदर पिचाई यांनी या गुंतवणूकीबाबत माहिती दिली आहे.

अदानी समुहासोबत पार्टनरशीप

समोर आलेल्या माहितीनुसार गुगल पुढील पाच वर्षांत हे गुगल हब तयार करण्यासाठी 15 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च करणार आहे. यात अदानी समुहासोबत पार्टनरशीप करत एक डेटा सेंटरचीही स्थापना केली जाणार आहे. या कार्यक्रमाला इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नैसर्गिक उपाय; 'या' फळांमुळे होईल सर्दी खोकला दूर!

संबंधित बातम्या