वाई : विकासाच्या नावाखाली संवेदनशील क्षेत्रे हटविली जात आहेत. तोडली जाणारी झाडे टिकविणे गरजेचे आहे. निसर्ग हटवून कोणताही विकास नको, असे दमयंतीराजे भोसले यांनी येथे सांगितले.
येथील महागणपती घाटावरून समितीच्या तिसऱ्या कृतज्ञता यात्रेची सुरुवात झाली. तेथून शाहीर चौक, भगवा कट्टा, नगरपालिका कार्यालय, दातार दवाखाना, चावडी चौक, वंदे मातरम् चौक, जुम्मा मशीद, यंग रविवार, ब्राह्मणशाही मानाचा गणपती चौकमार्गे किसन वीर चौकात यात्रेची सांगता झाली. या वेळी त्या बोलत होत्या.
सुरूर- वाई- महाबळेश्वर- पोलादपूर रस्त्याच्या रुंदीकरणात सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन शेकडो वृक्ष हटविले जाणार आहेत. याविरोधात वाई शहरातील वृक्षप्रेमी एकवटले आहेत. ही निसर्गसंपदा हटवू नये, या मागणीसाठी वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथील पर्यावरणप्रेमींनी वाई शहरात कृतज्ञता यात्रा काढली. या यात्रेचे नेतृत्व दमयंतीराजे भोसले यांनी केले. यात्रेत लहान मुलांसह शेकडो युवक- युवती, महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी टाळ-मृदंगाच्या साथीत वृक्ष वल्ली आम्हा सोयरे..., असे म्हणत झाडे लावा, झाडे जगवा त्यापेक्षा झाडे तोडू नका. भकास विकास नको, बघता काय सामील व्हा, अशा घोषणा दिल्या.