पालकमंत्री पदावरून मी नाराज नाही

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची स्पष्टोक्ती

by Team Satara Today | published on : 25 January 2025


सातारा : राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहेत. पालकमंत्री किंवा मंत्रिपद मागून घेण्याची पध्दत भाजपमध्ये नाही. त्यामुळे सातार्‍याचे पालकमंत्रीपद मिळाले नाही, म्हणून मी नाराज असण्याचे कारण नाही. जिल्ह्यात चार मंत्री आहेत, आम्ही सर्वजण मिळून हातात हात घालून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करु, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.सातार्‍यातील सुरुची निवासस्थानी ना. शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्यावर पालकमंत्री म्हणून लातूरची जबाबदारी आली आहे. मी पहिल्यांदाच लातूर येथे झेंडा वंदनाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री म्हणून उपस्थित राहणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांसाठी मी काम करत राहणार आहे. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लातूर जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लावणार आहे.पालकमंत्रीपदाबाबत आपण नाराज असल्याची चर्चा आहे, याबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला असल्याने आमच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. मी नाराजी असण्याचे कारण नाही. पालकमंत्रीपद देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. ना. देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत जबाबदारीने पालकमंत्रीपदे देताना निर्णय घेतले आहेत. ज्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे, त्यांच्याकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. मंत्री किंवा पालकमंत्रीपद वाटप करताना मागून घेणे अशी पध्दत भाजपमध्ये नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य अधिकार वापरुन राज्यात पालकमंत्रीपदे दिली आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा कॉंग्रेसचे सातारा शहरात धरणे आंदोलन
पुढील बातमी
...तर मानहानीचा दावा ठोकणार आणि राज्यभर टाळे ठोक आंदोलन

संबंधित बातम्या