विसावा नाक्यावर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

रस्त्यावरील धुळयुक्त खडी न उचलल्याने आंदोलन

by Team Satara Today | published on : 29 November 2024


सातारा : जिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावर टाकलेल्या बारिक खडीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उसळत असून, वाहन चालविणे अवघड होत आहे. याबाबत कल्पना देऊनही संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही न केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी विसावा नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.

जिल्हा परिषद ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे जीकिरीचे बनले होते. या रस्त्याची दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक संघटनांकडून आंदोलनेही करण्यात आली. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. संबंधित ठेकेदाराकडून जिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बारिक खडींचा थर टाकण्यात आला. या खडीमुळे धुळीचे प्रचंड लोट उडू लागल्याने याचा वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय डोळ्यात धुळ गेल्याने दोन दिवसांत अनेक अपघातही झाले.

काही सामाजिक कार्यकर्ते तसेच दुकानदार, व्यापार्‍यांनी याची कल्पना संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाला दिली. मात्र, कोणतीही दखल न घेण्यात आल्याने शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता संतप्त नागरिकांकडून विसावा नाका येथे रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनाची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. रस्त्यावरील खडी उचलली जाईल. धूळ उडू नये यासाठी पाणी मारले जाईल, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, कामकाजात दिरंगाई करणार्‍या ठेकेदारांना बिल अदा करु नये, त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ता महारुद्र तिकुंडे, रिपाइंचे दादासाहेब ओव्हाळ, तन्मय नवले यांच्यासह व्यापारी, दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
पाणी न देणार्‍या अधिकार्‍याचा गोडोलीत निषेध

संबंधित बातम्या