जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. चुरशीची लढत होण्याची शक्यता असताना एकतर्फी निकाल लागला. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यामध्ये मागील दीड वर्षापासून मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले आहे. ओबीसीमधून आरक्षण घेण्यासाठी जरांगे पाटील आक्रमक असून त्यांनी आरक्षणासाठी सत्ताधारी महायुतीचा फटशा पाडा म्हणून घोषणा दिली. प्रत्यक्षात मात्र महायुतीने विक्रमी विजय मिळवला आहे. यानंतर आता जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये चर्चा सुरु आहे. याबाबत दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व म्हणून हवे आहेत. भाजपने राज्यामध्ये सर्वांत जास्त जागांवर विजय मिळाला असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचा झाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे, असे भाजप पक्षश्रेष्ठींचे मत आहे. यामुळे आता फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याच्यै मार्गावर आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमची जात आणि आमचे लेकरं बाळ मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भलं होईल असं आम्ही कधीही अपेक्षित धरलं नाही. त्या आमच्या वाट्याला कधीही संकटच आलेले आहेत. 70-75 वर्षात आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे कोणी आलं काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावं लागणार आहे, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्य़ाबाबत व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की, पहिल्यांदा तेच होते आणि आताही तेच आहे. त्याच्यामुळे आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. हे पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे. सत्ता, सत्ता असते. त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते आणि आताही तेच सत्तेत आहेत. त्याचे आम्हाला काही वाटत नाही. सासु जरा खंदूशी असल्यासारखी आहे, आणि सासुला जनता बरोबर ठेप्यावर आणते, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील हे आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा उपोषणावर बसणार आहेत. त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. जरांगे पाटील म्हणाले की,”आम्हाला आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा द्यायचा आहे. तो आम्ही करणार आहोत. देशात कधीही झाले नसेल असे भव्य आणि मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आता राजकारणाचा विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आहे, आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले आहे. आता मोठा लढा उभा करायचा आहे.”