छत्तीसगड : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारायणपूर-बिजापूर सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत 26हून अधिक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, नक्षलग्रस्त नारायणपूर-बिजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 26 हून अधिक नक्षलवादी ठार झाले.
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साओ म्हणाले की, "राज्यात आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर, बस्तर नक्षलमुक्त करण्यासाठी एक कार्यक्रम सुरू आहे. नारायणपूरमध्ये एका चकमकीत दोन डझनहून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. मार्च 2026 पर्यंत बस्तर नक्षलमुक्त व्हावे यासाठी आमचे सुरक्षा दल परिश्रमपूर्वक काम करत आहेत"
नारायणपूर जिल्ह्यातील अबुझहमद भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार म्हणाले की, जिल्ह्यातील अबुझमद भागातील माड विभागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) नारायणपूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी बिजापूर आणि डीआरजी कोंडागाव यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी रवाना करण्यात आले.
पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले की, आज सकाळपासून अबुझमद परिसरात डीआरजी आणि नक्षलवाद्यांच्या संयुक्त पथकात चकमक सुरू आहे. या संदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या चकमकीत मृत नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.