सातारा : खंडाळा तालुक्यातील हायटेक प्लास्टिक प्रा. लिमिटेड कंपनीत मोठ्या प्रमाणात बालकामगार मजूर काम करत आहेत. संबधित ठेकेदार हा या मजुरांचे शोषण करत असून संबंधित कंपनी तात्काळ बंद करावी. अन्यथा स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे, तालुकाध्यक्ष आप्पा तुपे, अजय घाडगे, अक्षय शिंदे उपस्थित होते. अशोक गायकवाड म्हणाले, सातारा जिल्ह्यात असणार्या सर्रास एमआयडीसीत बालकामगार आहेत. त्यात खंडाळ्यात हायटेक प्लास्टिक प्रा. लिमिटेड कंपनीत बालकामगार जास्त आहेत. या कामगारांचे वय 15-18 वर्षे इतके असून या कंपनीत प्लास्टिक बाटल्या तयार केल्या जात आहेत. लहान मुले कामाला ठेवणे हा कायद्याने गुन्हा असून याबाबत वारंवार तक्रार केली असूनही दखल घेतली जात नाही. त्याविरोधात आंदोलनाचा लढा सुरू करणार असताना पोलिस यंत्रणेकडून दबाव आणला गेला.
गेले चार दिवसापासून कंपनीच्या तेथे उपोषण सुरू आहे. ठेकेदार कामगारांना 12 तास काम करून घेत त्यांचे शोषण करत आहे. डॉ. बाबासाहेब यांनी दिलेल्या घटनेनुसार कामगारांना फक्त 8 तास काम असावे. प्रशासनाने तात्काळ या घटनेचे गांभीर्य ओळखून ही कंपनी बंद करावी, अन्यथा दि. 15 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
बालकामगार ठेवणारी कंपनी बंद करा : गायकवाड
15 ऑगस्टला अनोखे आंदोलन करण्याचा इशारा
by Team Satara Today | published on : 12 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा