सातारा : देशासमोर भारतीय संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प साकार करण्याचे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या 38 व्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत संविधान जागरच्या ‘राष्ट्रवाद, अल्पसंख्यांक व संविधान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.आत्तर होते. विचारमंचावर संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे, उपाध्यक्ष रमेश इंजे, विश्वस्त प्राचार्य डॉ.संजय कांबळे उपस्थित होते.
अन्वर राजन म्हणाले, भारतीय राष्ट्रवादाचा धर्मनिरपेक्षता, बंधुता व समता हा पाया आहे. राष्ट्र धर्म व भाषा या आधारे निर्माण होत नाही. फाळणीचा इतिहास सकारात्मक मांडण्याऐवजी खोट्या पद्धतीने सांगितला जातोय. खराखुरा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. मुस्लिमांची भाषा प्रदेशनिहाय स्थानिकच आहे, हे वास्तव समजून घेतले पाहिजे.
आधुनिक भारतातील सर्वधर्मीयांना, अल्पसंख्याकांना पुरेसा अवकाश व नागरिकत्वाचे सर्व अधिकार मिळण्याची आवश्यकता आहे. देशात हिंदू मुस्लिम प्रश्न पेटवून त्यांचा नाहक छळ करण्यात येत आहे. जातीयता व अस्पृश्यतेचा चटका बसल्याने धर्मांतरित झालेले मुस्लिम, ख्रिश्चन इथलेच मूळ भारतीय आहेत. त्यांनी भारतीय संस्कृती, भाषा आदींचे वैविध्य टिकवून ठेवले आहे. सुफी संतांचे मठ सर्वांसाठी खुले राहिले आहेत. प्रबोधन चळवळींचा, धर्मांचा इतिहास समजून घेण्याची गरज आहे, असे अन्वर राजन यांनी सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्य संजय कांबळे यांनी केले. प्रसाद गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.