सातारा : जिल्हा परिषदेच्या मसूर (ता. कराड) येथील मुलींच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका व लोकसाहित्याच्या अभ्यासक सौ. स्वाती सूर्यकांत बाजारे यांनी लिहिलेल्या 'चिमणी पाखरं' या पुस्तकाचा राज्य पातळीवर गौरव झाला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील शाळांमध्ये हे पुस्तक पोहोचणार आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रम २०२४-२५ साठी आयोजित पुस्तक निर्मितीच्या उपक्रमात स्वाती बाजारे सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमासाठी त्यांनी नवी पिढी सुसंस्कारित घडावी या तळमळीतून 'चिमणी पाखरं' पुस्तकाची निर्मिती केली होती. राज्यभरातून या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रवेशिकांमधून या पुस्तकाची निवड झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून ते राज्यभरातील शाळांमध्ये वितरित होत आहे.
हा बहुमान मिळाल्याबद्दल सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर सभागृहात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांच्या हस्ते व उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अमोल डोंबाळे, माजी प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, वरिष्ठ अधिव्याख्याता विजय कोकरे, समन्वयक कृष्णा फडतरे, विभाग प्रमुख अन्नपूर्णा माळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाती बाजारे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
बाल साहित्य तसा अवघड प्रकार. कारण बालकांच्या वयाशी, त्यांच्या समजून घेण्याच्या क्षमतेशी एकरूप होऊन लिहावे लागते. त्यासाठी सृजनशीलतेबरोबरच मनाची निरागसता महत्त्वाची असते. चिमणी पाखरं पुस्तकाची राज्यपातळीवर घेतली गेलेली दखल ही स्वाती बाजारे यांच्या सृजनशील लेखणाला मिळालेली पोचपावतीच आहे. या बहुमानाबद्दल त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.