सातारा : श्री.छ. शिवाजी महाराजांच्या काळातील गड, किल्ल्यांची जोपासना व्हावी, तिथे स्वच्छता रहावे, त्यांचे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी जयहिंद गणेशोत्व मंडळ आणि मावळा फौंडेशनने पुढाकार घेत गड, किल्ला स्वच्छता मोहिमे सुरु केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ रायगड किल्ल्यापासून करण्यात आला. या मोहिमेवेळी मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित राहत या मोहिमेला पाठिंबा दिला.
लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव सुरु केला तो वारसा साताऱ्यातील शनिवार चौक, 501 पाटी येथील जयहिंद गणेशोत्सव मंडळ, चालवत आहे. या मंडळाच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक आणि नाविन्यपूर्ण, समाजाला दिशा देणारे उपक्रम राबवले जातात. मंडळाने आता गड, किल्ल्याची स्वच्छता करण्याचा उपक्रम सुरु केला असून त्याला मावळा फौंडेशनचे साथ मिळाली आहे. मोहिमेचा प्रारंभ रायगड किल्ल्यापासून झाला. त्यासाठी मंगळवारी साताऱ्यातून 30 ते 40 पदाधिकारी आणि लहान तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते रायगड किल्ल्याकडे रवाना झाले होते. रायगड किल्ल्यावर पोहचून या परिसरातील कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या तसेच स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत २० पोती कचरा संकलन झाले. या मोहिमेला मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला त्यामुळे स्वच्छता मोहिम राबवणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता.
यावेळी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले, रायगड हा किल्ला समस्त शिवप्रेमींची अस्मिता असून मावळा फौंडेशन आणि जयहिंद गणेशोत्सव मंडळाने राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. स्वराज्याच्या शेवटची राजधानी साताऱ्यातून येऊन हा उपक्रम राबवणे कौतुकास्पद असून त्याबद्दल दोन्ही संस्थांचे मी अभिनंदन करुन धन्यवाद देतो. स्वखर्चाने आणि मेहनत करुन दोन्ही मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली आहे. यापुढे काही गरज लागल्यास आम्ही पाठीशी आहोत, अशी ग्वाही ही मंत्री गोगावले यांनी दिली. रायगडावली स्वच्छतो मोहिमेप्रसंगी जयहिंद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाघमळे, सचिव अनिल जठार, खजिनदार प्रशांत वांकर, बिपीन दलाल, प्रमोद मुळे,विनय नागर, निलेश पंडित, विशाल धबधबे, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.