दापोली : दिवाळीच्या सुट्ट्या पडताच पर्यटनाला सुरुवात झाली असून बुकिंग केलेल्या पर्यटकांनी दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी केली आहे. मात्र यंदा रनिंग पर्यटकांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. वन डे टूरसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढू लागली आहे. दापोलीच्या किनारपट्टीवर 2 तारखेपासून 2.50 ते 3 लाख पर्यटक येऊन गेले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं येथील पर्यटन व्यवसायिकांनी सांगितलं आहे.
दिवाळीच्या सुट्टयांमध्ये कोकणातील विविध पर्यटनस्थळ पर्यटकांनी गजबजली आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी ठिकाणाहून कोकणामध्ये पर्यटक दाखल होत आहेत. कोकणातील रिसॉर्टमध्ये गेल्या दोन महिन्यांपूर्वी पासूनच पर्यटकांनी बुकिंग करून ठेवले होते. आता पुढच्या येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये बुकिंगसाठी पर्यटकांकडून चौकशी केली जात आहे. काहींनी मात्र तीन-चार महिने आधीच नियोजन करून कोकणात दिवाळी साजरी करण्याचे पक्के केले होते. रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीपासून दूर, नीरव शांतता अनुभवत समुद्राच्या साक्षीने दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत असतात.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक अशी प्रेक्षणीय स्थळे पहाण्यासाठी, तेथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी या तिन्ही जिल्ह्यातील ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती असते. अथांग समुद्रकिनारा हे पर्यटनाचे मुख्य आकर्षण असते. नमन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि येथील विविध कलाप्रकार दाखविण्यासाठी काही रिसॉर्टमधून सायंकाळच्या वेळी याचे आयोजन करण्यात येते. पर्यटकांना केवळ शांतता हवी असते. येथील निसर्ग अनुभवायचा असतो. आणि म्हणून न चुकता ही कुटुंब येथील शांत वातावरणाचा अनुभव घेत दिवाळी साजरी करण्यासाठी येतात.