सातारा : शेतकऱ्यांचे 10 शेतीपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रहिमतपूर पोलिसांनी पर्दाफाश केला. 10 शेतीपंप आणि 1 महिंद्रा पिकअप गाडी असा एकूण आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये तिघेजण अल्पवयीन मुले आहेत. कारवाईबाबतची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद नेवसे यांनी दिली .
रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तारगाव आणि नलावडेवाडी शिवारातून आरफळ डावा कालवा यावर बसवलेले 10 शेती पंप चोरीला गेले होते. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे पिकांना पाणी देणे खूप गरजेचे असल्यामुळे संबंधित शेतकरी हवालदील झाले होते. चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, कौशल्यपूर्ण तपास करून संबंधित टोळीचाछडा लावला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शना खाली रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विनोद नेवसे व सहकाऱ्यांनी केली. पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णु खुडे, जोतिराम भुजबळ, शंकर घाडगे, प्रविण बर्गे, तुषार काळंगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.