सातारा : ज्या ग्रंथालयातून ग्रंथ व्यासंगाची आवड तयार होते, त्या ग्रंथालयाच्या सेवकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळणे गरजेचे आहे. त्यांना उपाशी ठेवण्यामध्ये राज्य सरकारला काय स्वारस्य आहे, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी करत समाजाला डोळसपणे पाहण्याची दृष्टी पुस्तक वाचनातून मिळते, असे प्रतिपादन केले.
गेले चार दिवस तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीत सुरू असलेल्या 24 व्या ग्रंथ महोत्सवाचा सोमवारी शानदार समारोप झाला. यावेळी ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे कार्यवाहक शिरीष चिटणीस, सहसमन्वयक सुनिता कदम, उपाध्यक्ष विना लांडगे, माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिता राजे पवार, डॉक्टर संदीप श्रोत्री, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे इत्यादी उपस्थित होते.
सबनीस पुढे म्हणाले, साताऱ्याचा ग्रंथ महोत्सव गेल्या 24 वर्षापासून ज्ञानाची पेरणी करत आहे. विश्वाची रचनात्मक पातळी ग्रंथ वाचणाऱ्यांची संख्या प्रकाशकांची संख्या तसेच साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांच्या सकस साहित्यावरून ठरत असते. महात्म्यांचे पोषण ग्रंथालयाने केले. पुढार्यांनी सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे त्यांनी आपली भाषा सांभाळावी, अशी अपेक्षा सबनीस यांनी व्यक्त केली. ग्रंथपालांना उपाशी ठेवून समाज व शासन प्रगती करू शकत नाही. त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. कारण समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी पुस्तक वाचनातून येते आणि पुस्तकाचा व्यासंग हा शिक्षणाची केंद्रे असणाऱ्या ग्रंथालयातून घडत असतो. त्यासाठी ग्रंथालय सेवक हा समाधानी असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ग्रंथालयाचा गळा घोटण्याचे काम राज्य सरकार करत आहे, असा आरोप करत त्यांनी शासन चुकीच्या ठिकाणी प्रगतीच्या खुणा शोधत आहेत, असेही ते म्हणाले. ग्रंथालय ओस पडत चालली आहेत. ग्रंथ चळवळ चालवणे हे कसरतीचे काम आहे. ग्रंथालयांच्या संदर्भातील धोरणांचा दुटप्पीपणा समाजाने राज्य शासनाने सोडावा, असेही ते म्हणाले. शिक्षकांनी सर्व प्रकारचे साहित्य वाचावे. डोळसपणे पाहण्याची दृष्टी पुस्तक वाचनातून येते. त्यासाठी समग्र साहित्य वाचावे. गुणदोषासकट पुस्तके असतात. त्यातील दोषाचा भाग सोडून गुणात्मक वाचन झाले तर त्याचा जीवनामध्ये अधिक फायदा होतो. पुस्तक माणसाला माणूस बनवतात. विवेकावर आधारित आकलन पुस्तक वाचनातून येते. त्याकरिता वाचनालय समृद्ध करा, वाचन समृद्ध करा आणि ग्रंथालय सेवकाला उभारी द्या, असे ते म्हणाले.
यंदाच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त महोत्सव संयोजन समितीच्या वतीने सबनीस यांचा शाल, श्रीफळ आणि विशेष मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ग्रंथदिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बक्षीस मिळवलेल्या वेगवेगळ्या शाळांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता कदम यांनी केले. ग्रंथ महोत्सवाचा आढावा घेऊन कार्यवाह शिरिष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.