मंडईतील शेतकरी वर्गाच्या राखीव जागेवर व्यापारी करताहेत दादागिरी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 20 February 2025


सातारा : सातारा शहर परिसर परिसरात शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करण्यासाठी जागेची अडचण होत आहे. मंडईतील शेतकऱ्यांच्या राखीव जागेवर व्यापारी अतिक्रमण करत असून त्यांच्या दादागिरीने शेतकरी वैतागले आहेत. त्यांच्या जागेची तात्काळ व्यवस्था करून या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी गुरुवारी पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना सादर केले.

या निवेदनात नमूद आहे की, रोज भाजी मंडई मध्ये शेतकरी व व्यापारी यांच्यात जागेवरून वादावादी होत आहे. शेतकऱ्यांच्या राखीव जागेवर कोणी व्यापारी बसणार नाही, अशी कायमस्वरूपी योजना केली जावी. रोज कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी व फळकूट दादा येऊन शेतकऱ्यांना त्रास देतात. परप्रांतीय लोकांकडून गैरमार्गाने देवाण-घेवाण करून त्यांना शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जागेवर बसवतात. उच्च न्यायालयाने निकाल दिल्याप्रमाणे लोकांना स्थानिक जागेवर बसून अथवा फिरून कोणताही व्यवसाय करता येणार नाही. त्यांच्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने थेट शेतकरी ते ग्राहक अशी शेतीमालाची विक्री करता यावी, यासाठी हे आदेश दिले आहेत.

सातारा शहरात व्यापारी ग्राहकांच्या थेट बाजारपेठेत अडथळा निर्माण करत आहेत. शेतकरी ते ग्राहक या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरता शहरात मध्यवर्ती ठिकाणी फक्त शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. या संदर्भात आपण तात्काळ कार्यवाही करावी. येथे पाच दिवसात या प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे. अथवा हा प्रश्न सुटेपर्यंत आपल्या कार्यालयात अथवा समोरच्या जागेत मंडळी भरवली जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ई-वेहिकल वापरकर्त्यांचा आसगाव ग्रामपंचायत करणार पर्यावरण मित्र सन्मान
पुढील बातमी
जिल्ह्यातील निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल : धैर्यशील कदम

संबंधित बातम्या