कोयनानगर : भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या अंदाजानुसार वातावरणातील बदल, आर्द्र वाऱ्यांचा प्रभाव आणि स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या ढगांमुळे कोयनानगर परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शनिवारी दुपारनंतर अचानक आकाश ढगाळ बनले आणि काही भागात पावसाने हजेरी लावल्याने हवामानात लक्षणीय बदल झाला.
कोयनानगर तसेच नवजा, हेलवाक व परिसरातील डोंगराळ भागात दिवसभर उष्णतेची तीव्रता जाणवत होती. मात्र दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढून वातावरणात गारवा निर्माण झाला. काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या काढणीस आलेल्या भाजीपाला व इतर पिकांवर अवकाळी पावसाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे कोयनानगर परिसरात गारवा वाढला असून वातावरणात बदल स्पष्टपणे जाणवत आहे.