सातारा : सातारा शहरात बंद पडलेल्या टपऱ्या वाहतुकीच्या कोंडीचे कारण ठरत आहेत. त्यामुळे त्या हटवण्याचा धडाका पालिकेने लावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सातारा पालिकेने सातारा मध्यवर्ती बस स्टँड परिसरातील तब्बल दहा टपऱ्या हटवल्या आहेत. यावेळी टपरी चालक आणि नगरपालिका कर्मचारी यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. तरीसुद्धा टपरी जप्त होणारच, या भूमिकेमुळे टपरी चालकांचा विरोध मावळला आहे.
सातारा शहरांमध्ये मोकळ्या जागा ताब्यात घेऊन तेथे विनापरवाना टपरी टाकणारे फळकुट दादा आणि त्यांचा भाडेपट्टा याची आकडेवारी डोळे विस्फारून टाकणारी आहे. या संदर्भात सातारा पालिकेकडे यापूर्वी वारंवार तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे बंद टपऱ्यांच्या विरोधात सातारा पालिकेने मोहीम गतिमान केली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून हुतात्मा उद्यान चौक ते करंजे ओढा व हुतात्मा उद्यान चौक ते सातारा स्टॅन्ड परिसर यादरम्यानच्या बंद पडलेल्या दहा टपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल अडीच तास ही कारवाई सुरू होती. यावेळी सातारा पालिकेचे तीन डंपर, 15 कर्मचारी असा लवाजमा घटनास्थळावर उपस्थित होता.
ज्या टपऱ्यांना केवळ बंद ठेवले जात आहे, अशा टपऱ्या उचलून जप्त करण्यात आल्या. संबंधित मालकांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. बुधवारी सुद्धा टपरी चालक आणि पालिका कर्मचारी यांच्यामध्ये काही वादावादीचे प्रसंग घडले. अमुक-तमुक नेत्याचा, नगरसेवकाचा अथवा एखाद्या वाड्याचा संदर्भ देऊन काही टपरीचालक पुढे येत होते. मात्र तरी त्यांना न जुमानता सातारा पालिकेने आपली कारवाई पुढे सुरू ठेवली. येत्या दोन दिवसांमध्ये सातारा शहरातील सुमारे दीडशेहून अधिक बंद टपऱ्या उचलल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.