अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांवर पर्यटन बंदी

by Team Satara Today | published on : 24 June 2025


राजगड : राजगड तालुक्यात होणाऱ्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर किल्ले, धबधब्यांबरोबरच अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर पर्यटन बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पर्यटकांसाठी दर पावसळ्यात आकर्षणाचा विषय ठरत असलेले राजगड तालुक्यातील किल्ले तोरणा, राजगड, तसेच पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसर, मद्धे घाट धबधब्याबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी तसेच रविवार, 22 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनाला प्रशासनाने मनाई केली असल्याचा आदेश भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सारात यांनी दिले आहेत.पर्यटन बंदीचे आदेश 22 जून रोजी दुपारी जाहीर झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. यामुळे सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी गडावर व संबंधित पर्यटन स्थळावर गेलेल्या पर्यटकांना नाराज होऊन परतावे लागले.

पावसाळा सुरू झाले की पर्यटकांची पावलं राजगड, तोरणा, लिंगाणा किल्ल्याच्या ट्रेकिंगसह गुंजवणी, पानशेत, वरसगाव, धरणांबरोबरच तालुक्यातील छोटया-मोठ्या धबधब्यांच्या ठिकाणी वर्षाविहार वळू लागतात. मात्र यंदा राजगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणारी पर्जन्यवृष्टी व डोंगर भागातील निर्माण होणारे धुके, गडावर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या निसरड्या वाटा, घाटमाध्यावरील असणारे अरुंद रस्ते तसेच त्या परिसरात कोसळणाऱ्या दरडींमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील पर्यटन स्थळांवर प्रतिबंध करणे, मढेघाट परिसरात रॅपलिंगला बंदी घालण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि कापदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023, कलम 163 अंतर्गत राजगड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर 22 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

किल्ले तोरणा, राजगड व मढेघाट गुंजवणी पानशेत वरसगाव परिसरामध्ये पर्यटनास मनाई असा फलक लावण्यात आले आहेत. पुरातत्व खात्याचे पाहरेकरी बापु साबळे, पवन साखरे, आकाश कचरे, विशाल पिलावरे गडाच्या पायध्याला पात खुर्द येथे पाहरा देत होते. या वेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य तसेच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

1) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उत्तरणे व पोहणे

2) धबधब्याच्या वर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहात खाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणांवर सेल्फी काढणे अथवा कोणत्याही प्रकारची चित्रीकरण करणे.

3)  वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे.

4) नैसर्गिक ठिकाणी मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्यविक्री करणे, उघड्यावर मद्य सेवन करणे.

5) सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या धर्माकोल व इतर प्लास्टिकचे साहित्य इतरत्र फेकणे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट
पुढील बातमी
चंद्रभागेत स्नानासाठी गेलेले पाच भाविक बुडाले

संबंधित बातम्या