सातारा : नांदगाव (ता. सातारा) परिसरात कृष्णा नदीचे पात्र पुन्हा एकदा कोरडे पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून काही जणांकडून बेकायदेशीररीत्या पाणी वळवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कृष्णा माई आमची आई असून ती शेतकरी व सर्वसामान्यांसाठी वरदायिनी आहे. या नदीवर हजारो कोटींची शेती गुंतवणूक अवलंबून आहे. तसेच अनेक गावांमध्ये व शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय याच नदीच्या माध्यमातून केली जाते. असे असताना सत्तेचा व अधिकाराचा गैरफायदा घेत काही जण वारंवार पाणी पळवण्याचे बेकायदेशीर प्रकार करत आहेत.”
जनता संघर्ष करून न्याय मिळवेल
या प्रकारांना तात्काळ आळा घालावा, अन्यथा शेतकरी व नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. “ही बेकायदेशीर कामे त्वरित बंद करा, अन्यथा जनता संघर्ष करून न्याय मिळवेल,” असे शेळके यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या आरोपांबाबत प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये मात्र संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.