कोरेगाव : कोरेगाव–तडवळे संमत कोरेगाव या महत्त्वाच्या मार्गाचे काम दीर्घकाळापासून बंद ठेवण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत, येत्या आठ दिवसात काम पुन्हा सुरू न झाल्यास कोरेगाव शहरातील आझाद चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांच्या नेतृत्वाखाली तडवळे संमत कोरेगाव, आसगाव आणि खेड-नांदगिरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. सत्यवान शिर्के, प्रशांत साळुंखे, अनिल शिर्के, पंकज वाघ, निलेश शिंदे, अक्षय शिर्के, धीरज माने आणि समीर साळुंखे यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला जाब विचारत निवेदन सादर केले. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण, कोरेगाव पोलीस ठाण्याचे हवालदार विजय जाधव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना जीवन शिर्के यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यश काटकर, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि प्रांताधिकारी प्रमोद कुदळे हे अधिकारी अनुपस्थित असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सामान्य नागरिकांना तातडीच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालयात यावे लागते, मात्र संबंधित अधिकारीच उपलब्ध नसतील तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी लवकरच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सविस्तर निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच सोमवार आणि गुरुवारी अनावश्यक बैठका किंवा व्हिडिओ कॉन्फरन्समुळे अधिकारी कार्यालयाबाहेर राहू नयेत, अशी मागणीही संघटनेने केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, रस्त्याचे काम रखडल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामाला गती द्यावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.