हुश्श... सुटलो बुवा एकदाचा!

सारे काही आलबेल झाले; संजय शेलार यांचा खुनी सापडला...

by Team Satara Today | published on : 17 January 2025


- विनित जवळकर

सातारा : संजय शेलार यांचा खून झाला आणि तो का, कोणी, कसा केला याबाबतच्या प्रश्‍नांनी सातारकरांच्या मनात विचारांचे काहूर माजले. या खून प्रकरणात अरुण कापसे यांच्यासारख्या बड्याव्यावसायिकालाही गोवण्यात (?) आले. मात्र, तांत्रिक कारणाने ही अटकच बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांना सोडूनही देण्यात आले. मात्र, यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकास शेलार खून प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याने खुनाची कबुलीही दिली आहे. त्यामुळे संजय शेलार यांच्या खून खटल्यातील आरोपी तपासाची प्रक्रिया पूर्ण झाली, असेच काहीसे दिसून येत आहे. मात्र, काही प्रश्‍नांची उत्तरे अनुत्तरितच राहतात.

फळणी, ता. जावली येथील संजय गणपत शेलार यांचा मृतदेह 2 जानेवारी रोजी सापडल्यानंतर पोलिसांसमोर बरेच प्रश्‍न उपस्थित झाले. यानंतर 14 दिवसांच्या कालावधीनंतर संजय शेलार यांच्या पत्नीने आणि वडिलांनी या खुनाच्या गुन्ह्यात अरुण कापसे यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली होती. एवढ्या मोठ्या व्यावसायिकाचे नाव खुनासारख्या संवेदनशील गुन्ह्यातील जबाबात आल्यानंतर आणि हा जबाब टंकलिखित झाल्यानंतर तो वरिष्ठांनी वाचला नसेल, असे म्हणताच येणार नाही. यानंतर एवढ्या मोठ्या व्यावसायिकाला अटक करताना आपण त्याची नवीन प्रचलित कायद्यानुसार लेखी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. नाहीतर न्यायालयाच्या ताशेर्‍यांबरोबर आपल्याही वरिष्ठांचे ताशेरे आपल्यावर बसू शकतात, असे त्या जबाबदार अधिकार्‍यांना वाटले नसावे, हे म्हणणे हास्यास्पद आहे.

मृत संजय शेलार हा त्याच्या पत्नीसह कापसे यांच्या वाई तालुक्यातील शेंदूरजणे येथील साईटवर वॉचमनचे काम करीत होता. याच दरम्यान कापसे यांनी शेलार यांना मारहाणही केली होती. अनैतिक संबंधांच्या कारणातून हे सगळे घडले असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, एवढे सगळे माहित असूनही संजय शेलार खून प्रकरणातील वाढत्या जनरेट्यामुळे आणि निवेदनांमुळे कापसे यांना तडकाफडकी विना पूर्वसूचना देता पोलिसांकडून पाचारण करण्यात आले. त्यांची पोलिसांनी चार तास चौकशी केली आणि त्यांना अटक करण्यात आली. मात्र, या चौकशीतून निष्पन्न काय झाले, तर पुढच्याच दोन तासांत कापसे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मानाने रवाना झाले. यामध्ये पोलिसांचा गलथानपणा, की कायद्याचे सर्व नियम माहित असताना केलेले नाट्य होते? याची उकल काही केल्या होत नाही. दरम्यान, याप्रकरणी न्यायालय परिसरातही कायद्याच्या पुस्तकांचे खीस पाडण्याचे काम सुरु झाले. न्यायालयीन प्रक्रियेनंतरही पुन्हा रि-अरेस्ट करता येवू शकते का? याबाबत उहापोह सुरु झाला. मात्र कापसे सुटले, हे महत्त्वाचे.

याबरोबरच पोलिसांचा संयुक्त तपास सुरु असताना धाराशिव येथून शाहूपुरीतील नामचीन गुंड रामचंद्र दुबळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याला सातार्‍यात आणल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर त्याने संजय शेलार यांच्या खुनाची कबुली दिली आहे. यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. हा दुबळे सराईत गुन्हेगार असून पर्यायाने त्याला मद्याची सवय आहेच. सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनातील हा मुख्य आरोपी. मात्र, घटनेदिवशी संजय शेलार आणि दुबळे एकत्र होते. ते कसे एकत्र आले? शेलारचा दुबळेबरोबर प्रवास करण्याइतपतचा विश्‍वास कसा बसला? रामचंद्र दुबळे आणि अरुण कापसे यांचे काही संबंध आहेत का? यासाठी दुबळेचा सीडीआर मोठी भूमिका पार पाडू शकतो. मात्र, एवढे सगळे होण्यासाठी आणि संजय शेलारच्या खून प्रकरणात खोलात जावून चौकशी करण्याची मानसिकता पोलीस प्रशासनाला निर्माण होवो, हीच अपेक्षा सातारकर नागरिक व्यक्त करीत आहेत.

 

डॉ. सागर वाघांसारख्या वाघाची जिल्ह्याला गरज
डॉ. सागर वाघ यांच्याकडे बोरगाव पोलीस ठाण्याचा चार्ज होता. त्याकाळी संपूर्ण बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील गावांवर या पोलीस ठाण्याची जरबच नव्हे, तर आदर होता. सिंघमचित्रपट येण्याआधी बोरगावचे सिंघम डॉ. सागर वाघ ठरले होते. गुंडांवर जरब, पोलीस ठाण्यामार्फत समाजोपयोगी कामे यामुळे वाघांचा लौकिक बोरगाव पंचक्रोशीत घरातला माणूसअसा पसरला होता. गुन्हेगारांची मोडस त्यांनी ओळखली होती. एक आदर्श पोलीस ठाणे ठरावे, असा पगडा त्याकाळी बोरगाव पोलीस ठाण्याचा तेथील ग्रामस्थांवर होता. मात्र, त्यांची बदली होवून आता त्यांच्याकडे कोल्हापूर गांधीनगरचा चार्ज आहे.
मात्र, त्याच वाघांच्या बोरगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये न भूतो न भविष्यती घटना घडली. डॉ. घाडगे प्रकरणामध्ये चक्क तपासी अधिकारी तेलतुंबडे यांनीच न्यायालयाला आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. त्यादिवशी संपूर्ण सातारा न्यायालयातील वकिलांच्या चर्चेचा एकमेव विषय होता तो म्हणजे तेलतुंबडे यांचे तेस्टेटमेंट. न्यायालयासह सरकारी वकीलही या उत्तराने आवाक झाले होते. कुठे तो डॉ. सागर वाघांसारख्या वाघाचा रुतबा, आणि कुठे हे तेलतुंबडेंचे स्टेटमेंट... अशा अधिकार्‍यांच्या वर्तणुकीने संपूर्ण पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होते. त्यामुळेच सातारसारख्या पुनित जिल्ह्याला डॉ. सागर वाघ, भुईंज पोलीस ठाण्याचे रमेश गर्जे यांच्यासारख्या वाघांची नितांत गरज आहे, एवढेच म्हणावे वाटते.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इम्रान खान यांना मोठा धक्का; पाकिस्तानी कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा
पुढील बातमी
बीड जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

संबंधित बातम्या