सासवड : पुरंदरला दिव्यांग भवन उभारणार, मुंबई मध्ये पुरंदरच्या नागरिकांसाठी पुरंदर भवन उभारणार, स्वतःचे १२०० कोटी टाकून गुंजवणी धरण पूर्ण करणार, खानवडीला भवन उभारणार, एवढेच काय पण दोन वर्षात पुरंदरच्या विमानतळावरून विमान उड्डाण करणार अशा घोषणा केल्या. पण प्रत्यक्षात किती कामे पूर्ण केली ? असे प्रश्न उपस्थित करतानाच विमानतळाचा प्रकल्प स्वतः अडविला, भूसंपादनच्या अगोदर जागा निश्चित करता आली नाही. मग कशाचे कागदाचे विमान उड्डाण करणार होते का? अशा शब्दात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आमदार संजय जगताप यांच्यावर चौफेर हल्ला करीत जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
सासवडला हुंडेकरी चौकात नुकत्याच झालेल्या महायुतीच्या सभेत विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी माजी आमदार आमदार अशोक टेकवडे, संभाजी कुंजीर, भाजपचे पुरंदर हवेली समन्वयक बाबाराजे जाधवराव, भाजपचे तालुका अध्यक्ष नीलेश जगताप, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप यादव, तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे, अतुल म्हस्के, महिला आघाडीच्या ममता शिवतारे, राजेंद्र भिंताडे, आरपीआयचे अध्यक्ष पंकज धिवार, गणेश काका जगताप, डॉ राजेश दळवी, भाजपचे निरीक्षक संजय मिश्किल, दत्ता काळे, मंदार गिरमे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मी कोणत्याही पदावर नसताना जेजुरीला पाणी पुरवठा योजना दिली, सासवडला वीर वरून पाणी पुरवठा योजना दिली. जेजुरीचा १४६ कोटींचा विकास आराखडा दिला. एखाद्या भागात बिबट्यांचे प्रमाण वाढले तर लोक बिबट्या सफारी करा म्हणून सांगतात. आणि हे म्हणतात कुत्रा सफारी करा. काय ही चेष्टा. अशा शब्दात आमदार जगताप यांची खिल्ली उडवली आहे.
आमच्या आमदारांना पुरंदरच्या प्रश्र्नाशी काही देणे घेणे नाही. अधिवेशनात पुरंदर उपसा, वीर धरण, गुंजवणी पाणी योजनेचे प्रश्न उपस्थित करण्याऐवजी राज्यातील समस्या महत्वाच्या वाटतात. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार यांचा प्रश्न विचारण्यापेक्षा माळशिरस आणि पिसर्वे येथील ऊस जाळून गेला तो प्रश्न का विचारले गेले नाहीत ? पालखी महामार्गाचा प्रश्न विचारण्यापेक्षा मुंबई गोवा महामार्ग चौपादरिकरणचा प्रश्न महत्वाचा वाटतो. का?
तर त्यांच्याकडून कमिशन घेण्यासाठी. मला एवढे कोटी दे नाही तर मी तुझे प्रकरण बाहेर बोलतो. कोरोना काळात स्वतः च्या पैशा ने वाफेचे मशीन वाटले. आणि तुम्ही एकत्रित गोळा करून धान्य कुठे ठेवले ? तेलाचे डबे कुणाला विकले ? अख्या महाराष्ट्रात पुरंदरचे इज्जत घालवली.एकदा टेंडर मंजूर झाल्यावर त्यात बदल केल्यावर पैसे वाचतात.ते खाण्यासाठी गुंजवणी प्रकल्पात बदल केला. असा स्पष्ट आरोप विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांच्यावर केला आहे.