सातारा : देशातील निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीच्या विरोधात राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने सातार्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकार्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दि. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून शनिवारी दुपारी एकच्या सुमारास जिल्हा कॉंग्रेस कमिटीसमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, सुषमा राजेघोरपडे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव जाधव, ज्येष्ठ नेते अन्वर पाशा खान, जावळी तालुकाध्यक्ष संदीप माने, अमोल शिंदे, सुरेश इंगवले, विजय मोरे, सदाशिव बुधावले, वसंत काळंगे, प्रमोद चव्हाण, संतोष डांगे आदी सहभागी झाले होते.
25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. लोकशाही मार्गाने होणारी निवडणूक पारदर्शी व्हावी असे या दिवसाचे महत्व आहे. मात्र, देशातील निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकला आहे. आयोगाची कार्यपध्दती चुकीची आहे. त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे, असे पदाधिकार्यांनी सांगितले. तर यावेळी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा विजय असो.., ईव्हीएम हटाव, देश बचाओ.., भाजप शासनाचा धिक्कार असो... अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, हे आंदोलन रस्त्यावरच करण्यात आले. यामुळे मुख्य बसस्थाकडून पोवई नाक्याकडे जाणार्या मार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली होती.