सातारा : लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर शहरातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक रस्त्यांवरही पाणी जमा झाल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या निर्देशानुसार तातडीने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त देविदास जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लातूर शहरात मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यावर आणि शहरातील सकल भागात पाणी साचले. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. शहरात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासकीय नियमानुसार आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतीने करावी. मान्सूनपूर्व पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेवून महानगरपालिकेने शहरातील सर्व नाले, गटारी यांची सफाई मोहीम तात्काळ हाती घ्यावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई व हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरातील झोन निहाय पथके स्थापन करण्यात आली असून ही पथके प्रत्यक्ष फिल्डवर जावून काम करतील, याची खातरजमा करा. सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकीत दिले.
पावसामुळे नुकसान झालेल्या पूल, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करावी. आगामी काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नदी काठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याविषयी सूक्ष्म नियोजन करावे. पाटबंधारे विभागाने सिंचन प्रकल्पातील विसर्ग करण्यापूर्वी नदी काठावरील गावांना त्याबाबत माहिती देण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत पुरामुळे जीवित हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत सुरु राहावा, यासाठी महावितरणने विशेष मोहीम राबवून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात. वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तातडीने शासकीय मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
लातूर व उदगीर शहरात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. शहरातील सांडपाणी वाहून नेणारी गटारे साफसफाई करावी. तसेच विद्युत खांब, रोहीत्रांची तातडीने करावी. वीज पडून गंभीर जखमी झालेल्या तसेच मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी. तसेच अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव संगवी, आनंदवाडी, अहमदपूर रस्ता व पुलाचे काम त्वरित करण्याच्या सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी दिल्या.
लातूर शहरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. भविष्यात असा प्रकार घडू नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने नाले, गटारी स्वच्छतेची मोहीम तातडीने हाती घ्यावी, असे आमदार अमित देशमुख म्हणाले.
पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. रस्ते, पुलांचे नुकसान झाल्याने वाहतुकीवर परिणाम होत असल्याने दुरुस्तीची कामे लवकरात लवकर हाती घ्यावीत, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.
अनेक गावांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे नदी, ओढ्या काठावरील शेतजमीन खरडून गेली असून काही गावांमध्ये घरांचीही पडझड झाली आहे. याचे नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे गरजेचे असून नागरिकांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्युत तारा तुटल्यामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करावी, असे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले.
यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सूचना मांडल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लातूर शहरात नागरिकांच्या मदतीसाठी आणि नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विविध पथके स्थापन केली आहेत. तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. जिल्ह्यात झालेल्या पिक नुकसानीची माहिती त्यांनी बैठकीत दिली. तसेच वीज पडून मृत्युमुखी पडलेल्य व्यक्तींच्या नातेवाईकांना तातडीने मदत देण्यात येत असल्याचे सांगितले.