कळंबे ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे

ग्रामस्थांनी तलाठी जगताप यांच्या बदलीची केली मागणी

by Team Satara Today | published on : 22 July 2023


सातारा : आकले, धावडशी, कळंबे आणि माळ्याचीवाडी सजा साठी कार्यरत असलेल्या तलाठी कार्यालयाला कळंबे ग्रामस्थांनी संतप्त होत टाळे ठोकले. जगताप नावाचे तलाठी शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही, असा आरोप करून त्यांना या प्रकाराचा जाब विचारण्यात आला.
कोणतेही काम करण्यासाठी विलंब लावणे, नोंदी कमी करण्यास विलंब लावणे, रेशन कार्डावरील नोंदी कमी न करणे, बोजा कमी करण्यासाठी वेळ लावणे, विद्यार्थ्यांना दाखल्यासाठी हेलपाटे मारायला लावणे असे अनेक प्रकार गेले वर्षभर घडत असल्याने तलाठ्याच्या या अनागोंदी कारभाराला कंटाळून कळंबे ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाला टाळे ठोकून आपला संताप व्यक्त केला.
याबाबत आंदोलकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तलाठी जगताप हे कळंबे गावातील ग्रामस्थ शेतकऱ्यांची कामे करत नसल्याने त्याबाबत विचारणा करण्यासाठी आकले तालुका सातारा येथील ग्रामस्थ तलाठी जगताप यांच्या कार्यालयात दाखल झाले. कळंबे ग्रामस्थांची कामे का करत नाही ? अशी विचारणा केली असता जगताप यांनी उडवाउडवीची उत्तरे करायला सुरुवात केली. ग्रामस्थ यांच्यासमोर तलाठी जगताप यांनी न केलेल्या कामाची यादीच वाचून दाखवली. मात्र तलाठी कोणतेही म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हते. कार्यालय हे ग्रामपंचायतीचे आहे. माझ्याकडे याची चावी नाही असे सांगत जगताप तिथून निघून गेले. आकले ग्रामस्थांनी संतप्त होत ग्रामपंचायतीच्या शेजारी असणाऱ्या तलाठी सजाला टाळे ठोकून जगताप यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आंदोलन केले. तसेच कामात सातत्याने टाळाटाळ करून शेतकरी, विद्यार्थी यांची दाखल्यांसाठी अडवणूक करणाऱ्या जगताप यांची तातडीने बदली करावी, अशी अशी मागणी आकले ग्रामस्थांनी केली.
या आंदोलनात संभाजी इंदलकर, चेअरमन नामदेव इंदलकर, दशरथ इंदलकर, शिवाजी पाटील, शिवाजी इंदलकर, दीपक इंदलकर, अजय तेंडुलकर, दत्तात्रय अंधारे, विजय इंदलकर, नाना भुजबळ तसेच कळंबे ग्रामस्थ सहभागी झाले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुहास राजेशिर्के यांच्याकडून भिक्षेकरी गृहामध्ये अन्नदान
पुढील बातमी
पक्षाने टाकलेला विश्वास सक्षमतेने सार्थ ठरवणार

संबंधित बातम्या