सातारा : सातारा-जावली मतदारसंघातील प्रत्येक गावातील सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच केला आहे. जावली तालुक्यात पर्यटनवाढीसह येथील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना सुरु आहेत. आगामी काळात जावली तालुक्यातील कोणत्याही गावातील एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, सर्वप्रकारच्या समस्या सोडवल्या जातील, असा शब्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
जावली तालुक्यातील वरोशी ते वाहिटे या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि वाहिटे ते माचूतर हा नवीन रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, सरपंच राजाराम जांभळे, नाना जांभळे, हरिभाऊ शेलार, विकास ओंबळे, संतोष कासुर्डे, सागर धनावडे, प्रवीण कांबळे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जावली तालुक्यासाठी १ टी.एम.सी. पाणीसाठा आरक्षित करण्यात आलेला आहे. हा पाणीसाठा कशापद्धतीने वापरात आणायचा याचा सर्वानुमते निर्णय घेऊ. बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावताना कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊनच याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. तालुक्यातील दुर्गम- डोंगराळ भागात पर्यटनवाढीसह दळणवळण सुकर करण्यासाठी नवनवीन रस्ते मार्गी लावले जातील. ग्रामस्थांच्या सूचनेनुसार त्या- त्या गावातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देऊन प्रत्येक गावातील उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.