सातारा : मुंबई पोलिसांबद्दल बेताल वक्तव्य करणार्या आमदार संजय गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यावा. पोलिसांचा अपमान महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा शहर संघटक प्रणव सावंत यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सादर केले. यावेळी शहर प्रमुख रवींद्र भणगे, उप शहरप्रमुख गणेश अहिवळे, सुमित नाईक, रामचंद्र साळुंखे, सागर धोत्रे, शिवेंद्र ताटे इत्यादी उपस्थित होते.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, पोलीस बांधवांना खाकीतला देव असे संबोधतात. ते महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करतात. मुंबईत जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हेमंत करकरे, तुकाराम ओंबळे, अशोक कामटे या पोलिसांनी आपले बलिदान दिले. पोलिसांबद्दल बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यावा. पोलिसांचा अपमान जनता कधीही सहन करणार नाही, असा संताप या पत्रकात नमूद करण्यात आला आहे.