नवी दिल्ली : तिहार तुरुंगात कैद्यांच्या पुनर्वसनाच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात असून, तुरुंग क्र. २ मधील ५० कैद्यांना पेपर फायली आणि फाइल बोर्ड्स बनविण्याचे काम देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे दिल्ली सरकारच्या अनेक विभागांसह दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडूनही या फाईलची खरेदी केली जात आहे. कैद्यांना अर्थपूर्ण रोजगाराच्या उद्देशाने राबविल्या जात असलेल्या व्यापक पुनर्वसन कार्यक्रमाचाच हा उपक्रम एक भाग आहे. शिक्षेनंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामील होण्यासाठी कैद्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकविली जात आहेत. तुरुंग नियमावलीनुसार, न्यायालयाने दोषी ठरविलेल्या कैद्यांना कामात गुंतवणे हे पुनर्वसन आणि शिस्तीच्या दृष्टीने आवश्यक आहे.
या फायलींच्या निर्मितीसाठी तिहार तुरुंगात स्वतंत्र विभागही बनविण्यात आल्याची माहिती तुरुंगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या कैद्यांना संरचित उत्पादन प्रक्रियेत सहभागी करण्यात आले असून त्यांच्या कौशल्यानुसार प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या प्रकारची कामे दिली जातात, असे अधिकाऱ्याने सांगितले. हे काम कापणे, जोडणी, छपाई आणि वाळवणे अशा टप्प्यांमध्ये विभागले आहे.
हे फक्त फाईलचे कव्हर तयार करण्यापुरते मर्यादित काम नसून कैद्यांमध्ये संघभावना निर्माण करण्याचा उद्देश आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. एखादा कैदी बोर्ड कापण्याचे काम करतो, दुसरा संबंधित विभागाचे नाव छापतो, तर इतर कैदी वाळविण्यासह तयार झालेले साहित्य व्यवस्थित रचून ठेवण्याचे काम करतात. या फाइलींसाठी दिल्ली सरकारच्या अनेक विभागांसह दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडूनही ऑर्डर नोंदविली जात आहे.
त्यांच्याकडून नियमित दस्तावेजीकरण व फाइलिंगसाठी फाईलचा उपयोग केला जातो, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली. तुरुंग प्रशासनाने सांगितले की, कच्चा माल खरेदी करण्याचा खर्च करणे आवश्यक आहे. आम्ही पेपर बोर्ड, छपाईसाठीची शाई आणि फाइल कव्हर्स खरेदी करतो. छपाई प्रक्रियेसाठी मशिन आणि मनुष्यबळही लागते. फाईलची किंमत कमी ठेवले जाते, पण मूलभूत गोष्टींचा खर्च भागविणे महत्त्वाचे आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तिहार तुरुंगाचे प्रशासनही या फाईलचे ग्राहक असून तुरुंगाच्या कार्यालयात फाईलींचा वापर केला जातो.
तिहार कारागृहातील विविध विभागांतील जवळपास २,४०० कैद्यांना दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या कामात गुंतविले जाते. सरकारच्या कामगार विभागाच्या नियमांनुसार त्यांना दैनंदिन वेतन दिले जाते. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे कैद्यांमध्ये शिस्त व उद्दिष्टांची जाणीव निर्माण होते. त्यामुळे ते पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते, असाही तुरुंग प्रशासनाचा विश्वास आहे.