सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या आदेशान्वये व राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने सातारानगरीत ढोलकी फड तमाशा महोत्सव सुरू आहे. डिजिटल युगामध्ये तमाशा चालवणे हे एक मोठे आव्हान आहे. तमाशाचे नाव चांगल्या पध्दतीने जपण्याचे काम मंगला बनसोडे यांनी केले असल्याचे गौरवोद्गार आ. मनोजदादा घोरपडे यांनी काढले.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने शाहू कलामंदिर सातारा येथे ढोलकी फड तमाशा महोत्सवाच्या दुसर्या पुष्पच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, पंकज चव्हाण, नितीन बनसोडे उपस्थित होते.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे म्हणाल्या, माझा कार्यक्रम सातार्यात झाला त्याचा मला आनंद होत आहे. महाराष्ट्रभर तमाशा महोत्सव झाला मात्र आपल्या सातारा जिल्ह्यात झाला नव्हता तो तमाशा महोत्सव होत असल्याने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आभार मानते. ढोलकी फड तमाशा महोत्सवामुळे कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख म्हणाले, मोबाईलवर असणार्या पिढीला तमाशासारखे चांगले प्रयोग दाखवणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात यात्रा जत्रांच्या माध्यमातून तमाशाचे फड होतात. तमाशा म्हणजे लोककला आहे, त्याला चालना मिळाली पाहिजे. ढोलकी फड तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला दुर्मीळ पांरपरिक अशी लोककला बघावयास मिळत आहे. नितीन बनसोडे यांच्यासह त्यांच्या तमाशा मंडळाने तानाजी कोंढाण्याची लढाई हे जिवंत वगनाट्य सादर करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळवली.