प्रा. अजित आप्पासाहेब पाटील यांचे दुखःद निधन

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुटुंबातील एक तारा निखळला

by Team Satara Today | published on : 04 September 2024


सातारा : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, लाईफ मेंबर बोर्डाचे माजी सदस्य, मराठी साहित्यातील सिद्धहस्तलेखक, प्रा. अजित आप्पासाहेब पाटील यांचे आज बुधवार दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता वयाच्या ७९ व्या वर्षी सांगली या ठिकाणी वृध्दपकाळाने दुखःद निधन झाले आहे. 

प्रा. अजित पाटील हे रसायनशास्त्र या विषयाचे अभ्यासू प्राध्यापक म्हणून सर्व परिचित होते. यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांचा परिचय होता. संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली होती. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये येणाऱ्या प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रा. अजित पाटील यांनी तन-मन-धन अर्पण करून अखंड कार्य केले आहे. कर्मवीरांचे विचार सर्वदूर पोहोचावेत यासाठी त्यांनी शेकडो व्याख्यानांच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कर्मवीरांचे विचार पोहोचवण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला. 

शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबरोबरच, मराठी साहित्यातील एक सिद्धहस्त लेखक म्हणून त्यांची एक स्वतंत्र ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती. कर्मवीरायण माणसातील देव, चंदनाचे पाय, गौतम बुद्ध, सूर्यपुत्र लोकमान्य टिळक, खरा महात्मा जोतीबा, खासेराव आण्णांची इष्कबाजी यासारख्या सर्वोत्तम दर्जाच्या कलाकृतींची त्यांनी निर्मिती केली आहे. त्यांच्या विनोदी कथा संग्रहास महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट वाड.मयाचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व आचार्य अत्रे विनोद व प्रौढ वाड.मय निर्मितीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर शब्दांचे गाव व शब्द हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. साधना, मार्मिक यासारख्या प्रतिथयश मासिकांमधून अडीचशेहून अधिक विनोदी कथा व कविता प्रसिध्द झाल्या आहेत. ‘माणसातील देव’ या कर्मवीरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे सातारा आकाशवाणी केंद्रावरून क्रमशः वाचन झाले होते. साहित्यातील निर्मितीबरोबरच रसायनशास्त्र या विषयातील अनेक क्रमिक पुस्तकांचे लेखनही प्रा. अजित पाटील यांनी केलेले होते. एक सिद्धहस्त लेखक म्हणून विद्यार्थी आणि मराठी वाचक त्यांना ओळखत होते. 

प्रा. अजित पाटील यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे महाराष्ट्राच्या समाज जीवनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. आज बुधवार दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेश विसर्जनासाठी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल
पुढील बातमी
बुद्धिबळाच्या डावात महायुती चितपट करेलच पण पहिली चाल खेळली शरद पवारांनी

संबंधित बातम्या