सातारा : सातारा शहर परिसरातील भिमाई स्मारकाचे काम गेल्या अनेक वर्षापासून तांत्रिक कारणास्तव अपूर्ण आहे. या स्मारकाचे काम पूर्णत्वाला जाऊन हे स्मारक लवकरच लोकार्पण व्हावे तसेच बोधि विहार येथील आंदोलनाला पाठिंबा व दलित बांधवांच्या न्याय मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने सातार्यातून रिपाई नेते अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च काढण्यात आला.
हा लॉंग मार्च भिमाई स्मारक सातारा ते चैत्यभूमी दादर इथपर्यंत काढण्यात येणार आहे. या आंदोलनाची भूमिका अशोक गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रियेमधून व्यक्त केली. या आंदोलनामध्ये अशोक गायकवाड यांच्याबरोबर 200 कार्यकर्ते लॉंग मार्च करत मुंबईला जाणार आहेत. यामध्ये रिपाई युवकचे प्रतीक गायकवाड, पूजा बनसोडे, प्राध्यापक शरद गायकवाड, अण्णा वायदंडे तसेच वेगवेगळ्या आघाड्यांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दुपारी साडेबारा वाजता अशोक गायकवाड यांच्या उपस्थितीत शाहू चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. दलित बांधवांच्या संदर्भात होणारे अन्याय त्यांच्या प्रलंबित मागण्या याला वाचा फोडणे, प्रशासनाचे लक्ष वेधणे तसेच सातार्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके जतन करणे, त्याचे संवर्धन, त्याचे पूर्णत्व आणि लोकार्पण या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, बिहार गया येथील बुद्ध विहाराचे पूर्ण नियंत्रण हे सनातनवादी प्रवृत्तीकडे आहे. ते मुक्त करून त्याचा ताबा बौद्ध समाजातील भिक्षुकांकडे द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी अशोक गायकवाड यांनी लॉंग मार्च काढण्याचा इशारा दिला होता.
आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत. राज्य शासनाने या मागण्या मान्य करून त्यावर तातडीने उपाययोजना करावी याकरिता हे आंदोलन छेडण्यात आल्याचे अशोक गायकवाड यांनी सांगितले आहे. रिपाईच्या कार्यकर्त्यांनी शाहू चौक येथून थेट प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागवल्या व तेथून पुन्हा जरंडेश्वर नाका येथे भिमाई स्मारकाला वंदन करून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने भर पावसात रवाना झाले.