सातारा : राज्यामध्ये विशेषतः मराठवाडा, कोकण व सातारा जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. पूरबाधितांवर ओढवलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 2 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेला साताऱ्याचा विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये पाऊस आणि थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी जीवित वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे. शेती आणि पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा तर पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. मराठवाडा, तसेच सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील ग्रामीण आणि शहरी जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झाले आहे.
अशा परिस्थितीत साताऱ्यात दि. 2 ऑक्टोबर रोजी होणारा शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा थाटामाटात, धुमधडाक्यात डामाडौलात करणे उचित नाही. त्यामुळे या सोहळ्यासाठी राज्य शासनाच्यावतीने यावर्षी देण्यात येणारा निधी पूर बाधितांच्या मदत कार्यासाठी परस्पर वर्ग करावा, असे आवाहनही खा. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सातारवासियांनी पूर बाधितांना मदत करावी
राज्यातील आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने एक भारतीय म्हणून पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी शक्य होईल इतकी आर्थिक किंवा वस्तू, धान्य स्वरूपातील मदत, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये जमा करावी, असेही आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.