सातारा : आरफळ तालुका सातारा येथील गट नंबर 980 942 271 या क्षेत्रातील 110 एकर सरकारी अकारीपड जमिनीची नोंद आहे या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली असून येथे इकोसिस्टीम विकसित झाली आहे. या क्षेत्रात जिल्हा प्रशासनाने आम्हाला विश्वासात न घेता शहीद जवानांच्या पत्नींना जागा देण्याचे ठरवले आहे. या निर्णयाला आरफळ ग्रामस्थांचा पूर्णतः विरोध आहे. वेळ पडल्यास आम्ही मोठे आंदोलन उभे करू, असा इशारा आरफळ गावच्या सरपंच अर्चना भोसले, उपसरपंच श्रीकांत पवार नरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
त्या आंदोलनाबाबत बोलताना नरेंद्र पवार म्हणाले, काळेश्वरी मंदिर येथे 21 मे रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये हा विरोधाचा ठराव करण्यात आला आहे. येथील गट नंबर 980 942 व 271 येथे 110 एकर वर डोंगर जमीन आहे. ही जमीन गायरान म्हणून गावाच्या लोकांची गुरे चराईचे क्षेत्र आहे. 1990 च्या आसपास प्रथम निलगिरी व इतर वृक्षांची लागवड सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आली. 2002 मध्ये आरफळ गावाला ग्रामस्वच्छता अभियानात बक्षीस मिळाले. जलसंधारण, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन यामुळे येथे इकोसिस्टीम तयार झाली आहे. यामुळे या घनदाट वनराजी मध्ये मोर, लांडोर, घुबड, बहिरी ससाणा, पोपट, किंगफिशर, बदक, रानकोंबडी, चिमण्या, कावळे, बगळे यांचा रहिवास तयार झाला आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने वीर शहीद जवानांच्या पत्नींना येथे जागा देण्याचे ठरवण्यात आले आहे. याची माहिती आम्हाला नुकतीच मिळाली.
या निर्णयाला आमचा विरोध आहे. वीरपत्नींना जागा देण्यास आमचा विरोध नाही, मात्र जिल्हा प्रशासनाने निर्णय घेताना येथील पर्यावरण विकसनाचा विचार करावा. आकार पड जमिनी या त्याच गावच्या ग्रामस्थांना परत द्यावयाच्या असतात, असा सरकारी नियम आहे. ते नियम डावलून आम्हाला विश्वासात न घेता जिल्हा प्रशासन परस्पर निर्णय घेत आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी अर्चना भोसले यांनी केली. अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने तसेच वेगळ्या पद्धतीने तीव्र स्वरूपाची आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.