सातारा : राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि त्यांची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्री श्री समर्थ सेवा मंडळ 1950 सालापासून सेवेत सहभागी आहे. या संस्थेचा अमृत महोत्सवी सोहळा सध्या सुरू असून कार्तिक शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक कृष्ण चतुर्थी म्हणजेच शुक्रवार दि. 15 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अमृत महोत्सव सोहळा सज्जनगड येथे होत आहे. या सोहळ्यात श्रीविष्णू पंचायतन याग याचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात अनेक थोर वैदिक, संत, विद्वान आणि धार्मिक परंपरेतील अध्यात्मिक पिठांचे परमपूज्य पीठाधीश यांच्या पावन उपस्थितीचा लाभ होणार आहे, अशी माहिती समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष डॉ अच्युत गोडबोले, कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांनी दिली.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा पुरोहित म्हणाले की, या महासोहळ्याचा प्रारंभ शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी साडेसात वाजता वेदमूर्ती याज्ञिकांचे हस्ते जप अनुष्ठानाच्या प्रारंभाने होणार आहे. त्यानंतर सकाळी आठ वाजता पंचायतन देवता व ग्रंथांची शोभायात्रा सर्व उपस्थित भक्त सहभागातून सज्जनगड येथे निघणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत सज्जनगड येथे उभारण्यात आलेल्या या सोहळ्यानिमित्त च्या श्रीराम मंदिर अयोध्येचे प्रतिकृती रूप असलेल्या भव्यसभा मंडपात वाराणसी येथील प्रथम महाविभूती पंडित प्रवर परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा शुभ प्रवेश होणार असून त्यानंतर सभामंडपात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन दीप प्रज्वलन शांती मंत्रांचे पठण आणि आशीर्वचन होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत परमपूज्य परम श्रद्धेय मंदाकिनीताई गंधे यांचे प्रवचन होणार असून दुपारी चार ते सहा या वेळेत पुणे येथील समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.रात्री 9 वाजता नरसोबाची वाडी येथील पंडित कृष्णेन्द्र वाडीकर यांची गायन सेवा संपन्न होणार आहे.
सोहळ्यातील दुसर्या दिवशी म्हणजेच शनिवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते दुपारी एक या वेळेत अग्निस्थापना आणि यज्ञास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत पुणे येथील परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज यांचे प्रवचन होणार असून सकाळी 11 ते 12:30 या वेळेत वाराणसी येथील पंडित प्रवर परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी चार वाजता देगलूर येथील ह भ प गाथामूर्ती परमपूज्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे वारकरी सांप्रदायिक कीर्तन होणार आहे. रात्री नऊ ते अकरा या वेळेस सुप्रसिद्ध गायक पंडित संजीव अभ्यंकर यांची गायन सेवा सादर होणार आहे.
रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते दुपारी एक या वेळेत वैदिक याज्ञिकांच्या हस्ते पंचायतन याग सुरूच राहणार असून सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत वसई येथील राष्ट्रीय अध्यक्ष धर्मसभा विद्वत संघाचे प्रमुख परमपूज्य ब्रह्मचारी निरंजनानंद, (वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य) यांचे प्रवचन होणार आहे त्यानंतर सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत कर्नाटकातील माणिकनगर येथील श्री माणिकप्रभू संस्थानचे पिठाधिपती परमपूज्य सद्गुरु ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी चार ते सहा या वेळेत माणिक नगर येथील माणिकप्रभू संस्थानचे सचिव परमपूज्य श्री आनंदराज माणिक प्रभू महाराज यांचे सुश्राव्य भजन कार्यक्रम होणार असून रात्री नऊ वाजता सुप्रसिद्ध गायिका कु. आर्या आंबेकर यांची गायन सेवा सादर होणार आहे.
सोमवार दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते एक या वेळेत वैदिक याज्ञिकांच्या हस्ते श्री विष्णू पंचायतन याग सुरूच राहणार असून सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत द्वारका पिठाचे महासंस्थानचे जगद्गुरु शंकराचार्य द्वारकापीठाधीश्वर श्री. श्री. सदानंद सरस्वती महास्वामीजी यांचे सज्जनगडावर आगमन होऊन नऊ ते साडेदहा यावेळेस सकाळी त्यांचे आशीर्वाद पर प्रवचन होणार आहे त्यानंतर सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत पुणे येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून दुपारी चार ते सहा या वेळेत देगलूर येथील परमपूज्य ह. भ. प. चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे प्रवचन होणार आहे रात्री नऊ ते 11 या वेळेत सुप्रसिद्ध गायक व पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य, पंडित जयतीर्थ मेऊंडी यांची गायन सेवा सादर होणार आहे.
मंगळवार दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी या महासोहळ्याची सांगता सकाळी सात ते दहा या वेळेत श्री विष्णू पंचायतन यागाचे उत्तरांग, बलिदान, स्नान, याग पूर्णाहूती, ब्रह्मवृंदास दक्षिणा प्रदान करून यजमानास आशीर्वाद व यागाची सांगता होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत उपस्थित भाविक साधकांद्वारे ब्रह्मवृंदांचे पूजन होऊन सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत परम श्रद्धेय मंदाकिनीताई गंधे यांचे समारोपपर प्रवचन होऊन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाहक समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांच्याद्वारे सोहळ्याचे आभार प्रदर्शन कार्यक्रम होऊन कल्याणकारी रामराया या प्रार्थनेने या सोहळ्याची सांगता होणार आहे या सर्व सोहळ्यास समस्त समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.