साताऱ्याचे साहित्य संमेलन भविष्यकालीन संमेलनासाठी निश्चित पथदर्शी ठरेल

ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण

by Team Satara Today | published on : 20 September 2025


सातारा  : वाचन संस्कृती तुटत चालली आहे असा कंठशोष संपूर्ण महाराष्ट्र करतो आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात गेल्या अडीच दशकापासून साहित्य सत्संग सुरू आहे. आजच्या तंत्रधिष्ठी त  युगामध्ये तरुण इंग्रजी वाचकांना मराठीच्या मांडवात आपल्याला आणायचे आहे. ग्रंथ महोत्सवाचे हक्काचे प्रेक्षक ठरलेले असतात मात्र लोकजागर केल्याशिवाय लोक साहित्य संमेलनाला येत नाहीत. शतकी संमेलनासाठी साताऱ्याचे संमेलन निश्चित पथदर्शक ठरेल,  या पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करावे लागेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनील कुमार लवटे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा व मावळा फाउंडेशन यांच्या तीने येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मसापचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे डॉ.  राजेंद्र माने, शिरीष चिटणीस, शाहूपुरी शाखा मसापचे अध्यक्ष नंदकुमार सावंत , मावळा फाउंडेशनचे चंद्रकांत बेबले उपस्थित होते. 

पुढील शंभर दिवसात सातत्याने लोक जागर करावा लागेल

लवटे पुढे म्हणाले, साताऱ्याचा ग्रंथ महोत्सव रौप्य महोत्सव वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे येथील शब्द सत्संग सातत्याने सुरू आहे. साहित्य संमेलने ही सातारकरांना नवीन नाहीत. एकीकडे साहित्याची नाळ तुटत चालली आहे असा कंठ शोष इतर जिल्हे करत आहेत.  मात्र सातारा साहित्य सत्संगामध्ये रमला आहे.  ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि द फडणीस यांनी बोधचिन्ह अत्यंत चातुर्य आणि बनवले आहे. तलवारीच्या दुसऱ्या टोकाला त्यांनी पेनाची रचना केली आहे.  सातारकरांवर भविष्यात अक्षर दुष्काळ पडणार नाही याची जबाबदारी पेलण्याची वेळ आहे. पुढील शंभरव्या साहित्य संमेलनासाठी साताऱ्याचे हे साहित्य संमेलन पथदर्शी ठरावे. केवळ गर्दी जमवून चालणार नाही तर तरुण इंग्रजी वाचकांना मराठीच्या मांडवात आणावे लागेल.  त्याकरता पुढील शंभर दिवसात सातत्याने लोक जागर करावा लागेल. काळाला धरून चालणारे परिसंवादाचे विषय ठरवावे लागतील 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे.  त्या दृष्टीने सुद्धा कार्यक्रम घ्यावे लागतील.  साताऱ्याचे साहित्य संमेलन हे पुढील अनेक भविष्यकालीन संमेलनासाठी निश्चित पथदर्शी ठरेल, या पद्धतीने मांडणी होणे आवश्यक आहे , अशी अपेक्षा लवटे यांनी व्यक्त केली. 

संमेलन यशस्वी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, 99 वे साहित्य संमेलन ही सातारकरांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्याने केलेल्या चळवळी या राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाल्याआहेत. मात्र सातारकर साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडतील अशी मला खात्री आहे. सातारकर एकदा जबाबदारी घेतल्यावर मागे पुन्हा हटत नाहीत. संमेलनामध्ये गर्दीमध्ये दर्दी निश्चितच दिसतील, असा आम्हाला विश्वास आहे.  साताऱ्याच्या साहित्य संमेलनाने आयोजनापूर्वीच अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.  यामध्ये प्रशासन सुद्धा आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. हा अक्षर साहित्याचा सामूहिक सोहळा असून तो यशस्वी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,  त्याकरिता आपण सज्ज राहूया,  असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.

जिल्हा प्रशासन संयोजन समितीबरोबर : जिल्हाधिकारी संतोष पाटील

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले,  भौतिक प्रगती म्हणजे विकास नाही भाषा संस्कृतीचा वारसा पुढील पिढीला संक्रमित होणे म्हणजेच साहित्य चळवळीचा वारसा समृद्ध करणे आहे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सातारा जिल्हा प्रशासन संपूर्णपणे संयोजन समितीबरोबर आहे.  वातावरण निर्मितीसाठी सुरुवातीला विद्यार्थी आणि शिक्षक यांचे एखादे विभागीय संमेलन निश्चितपणे घेऊ, अशी सूचना पाटील यांनी केली.

उस्फूर्त गर्दीचा विक्रम यंदाच्या साताऱ्याच्या संमेलनात मोडला जाईल : विनोद कुलकर्णी

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली .संयोजन समितीच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अधिकृत बोधचिन्हाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले आणि साताऱ्याच्या साहित्य संमेलनाचे प्रस्थापित विक्रमांची त्यांनी माहिती दिली.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या पाठिंबामुळे हे संमेलन साताऱ्यात घेणे शक्य झाले, असे कुलकर्णी म्हणत उस्फूर्त गर्दीचा विक्रम यंदाच्या साताऱ्याच्या संमेलनात मोडला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . 

मसापाचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकीहाळ यांनी आपले विचार व्यक्त करत संमेलनाच्या आयोजनासाठी एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश विनोद कुलकर्णी यांना सुपूर्द केला . सहवास महिला मंडळाच्या ज्येष्ठ महिलांनी साहित्य संमेलनाला दहा हजार रुपयांची देणगी दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नवभारत साक्षरता अभियानासाठी प्रबोधनपर ओव्यांचे आकर्षक सादरीकरण
पुढील बातमी
साताऱ्यात उद्या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाचा जाहीर सत्कार

संबंधित बातम्या