आंबेडकडकरवादीकडून परभणीबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर !

by Team Satara Today | published on : 13 December 2024


सातारा : परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करून गुन्हेगारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा आशयाचे निवेदन आंबेडकरप्रेमीसह विविध संघटनांनी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आले.

परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड ज्यांनी कोणी केली आहे? त्या घटनेचा निषेध करून हे निंदनीय भ्याड कृत्य ज्यांनी कोणी केलेले आहे? त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शासन होईल ! अशी कार्यवाही शासनाने करावी. तसेच या मागचा मास्टर माईंड  कोण आहे? याचाही शोध शासनाने घ्यावा. त्यांनाही कठोर शासन करावे. अशीही मागणी करण्यात आली आहे. महामानवांचे पुतळे, शिल्पे व संविधानाची प्रतीकृती तसेच तैलचित्रे ज्या-ज्या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत शासन व प्रशासन फार गंभीर नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. कारण, अनेक वेळा मागणी करूनही वारंवार घटना घडत आहेत. तेव्हा संबंधित यंत्रणाबाबत सुरक्षा-उपाय योजना करावी. अशी मागणी जनतेची व संघटनांची असतानाही याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामूळे विघ्नसंतोषी लोक याचा गैर फायदा घेऊन सर्वसामान्य जनतेत असंतोष माजवण्याचे काम करतात. त्यात सर्वसामान्य जनताही भरडली जाते. याचा विचार करून सुरक्षिततेची उभारणी शासनाने वेळीच केली असती तर, अशा घटना घडण्यास आळा घातला गेला असता. तेव्हा अशा घटना घडू नयेत. यासाठी उपाययोजना शासन करताना दिसत नाही. घटना घडल्यानंतर गुन्हेगारांना व त्याच्या मास्टर माईंडचा शोध घेऊन त्यांना शासन करण्याचे सोडून या घटनेचा निषेध करणाऱ्या आंदोलकांच्यावरच कोंबिंग आपरेशन करून गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानते. याचाही तीव्र  निषेध करून हे कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवुन शांतता निर्माण करावी. गुन्हा केलेल्यांना कडक शासन करून संबंधित ठिकाणी कायम स्वरूपाची कडक सुरक्षा यंत्रणा उभी करावी. आमच्या मागण्यांचा विचार शासनाने तातडीने करून कडक उपाययोजना आखावी. आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा, उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. सदरच्या निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे चंद्रकांत खंडाईत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सुपूर्द केले. यावेळी प्रकाश तासगावकर, मंगेश डावरे, तानाजी नागटीळक, सुनील निकाळजे, नंदकुमार काळे, गणेश कारंडे, महादेव मोरे, ऍड.विलास वहागावकर, सौ. ललिता जाधव, भीमराव जाधव, अनिल वीर आदी आंबेडवादी - प्रेमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तत्सम संघटनेचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत खंडाईत यांनी सत्ताधारी व विरोधक यांनी संविधानावर निवडणुकास सामोरे गेलेत.आता कुठे आहेत? असा खडा सवाल केला. दरम्यान, ऑल इंडिया पँथर सेना, गरुडा साम्राज्य टीम आदींनी निवेदन देऊन निषेध केला. "यापुढे संविधानाला हात जरी लावला तर आम्ही कदापी सहन करणार नाही. आम्हीही शस्त्र उचलू..."असाही गंभीर इशारा देण्यात आला आहे. अशाच प्रकारचे निवेदन संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच दादासाहेब ओव्हाळ यांच्याही नेतृत्वाखाली सम्बधितांना निवेदन देऊन राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाची शंभूराज देसाईंकडून पाहणी
पुढील बातमी
मागेल त्याला सौर कृषी पंप, एक लाखाचा टप्पा ओलांडला

संबंधित बातम्या