पुणे : ‘हम भारत की नारी हैं, फूल नही चिंगारी हैं, महिला शक्ती आयी हैं, नई रोशनी लायी हैं’ असे म्हणत हातात काठ्या घेऊन महिला अत्याचाराच्या विरोधात घोषणा देत, महिला सक्षमीकरणाची गाणी गात, पुण्यातील महिला आणि युवती रस्त्यावर उतरल्या. महिला जागर समितीच्या वतीने या जागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा फुले वाड्यातील क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. आमदार नितीन राऊत उपस्थित होते.
मोर्चाच्या मार्गावर रस्त्यात महिला सक्षमीकरणावर, महिला अत्याचाराच्या विरोधात महिलांनी, युवतींनी घोषणा दिल्या, गाणी, कविता सादर केल्या. त्यानंतर लाल महालातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सांगता करण्यात आली.
तसेच, देशातील ज्या महिलांवर अत्याचार झाले त्यांच्यासाठी मौन पाळून श्रद्धांजली देण्यात आली आणि अत्याचाराच्या विरोधात आम्ही उभे राहू, अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. मेणबत्त्या लावून त्या ज्योतीच्या प्रकाशाने अंधारावर मात करत, आम्ही एक दिवस नक्की एक न्यायपूर्ण आणि निर्भय समाज बनवण्याचा प्रयत्न करू, या निर्धाराने ‘हम होंगे कामयाब’ गाणे गाऊन जागर मोर्चाची सांगता झाली.
शोभा करांडे, अलका जोशी, असुंता पारधे, मृणालिनी वाणी, रंजना पासलकर, प्रियंका रणपिसे, शारदा नितनवरे यांनी मनोगत व्यक्त केले. गुलाबो गँगच्या संगीत तिवारी, नीता रजपूत, प्राची दुधाने, स्मिता शेट्टी, संगीत पटणे आदी उपस्थित होत्या. या वेळी ‘ओय नजर संभाल’, ‘महिलांवरील हिंसाचार आता बस’ असा सामाजिक संदेश देणारे टी-शर्टही बनविण्यात आले होते.