सातारा: संभाजीनगरवरून प्रचारासाठी आणलेल्या तब्बल २६ महिलांना अज्ञात व्यक्तीने वाऱ्यावर सोडल्याने, या महिलांनी सातारा एसटी बस स्थानकात उपाशीपोटी ठिय्या मांडला. एकनाथ शिंदे गटाच्या प्रचारासाठी आपल्याला आणल्याचा दावा या महिलांनी केला असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, सातारा शहरात राजकारणाचे एक संतापजनक रूप समोर आले आहे.
संभाजीनगरमधील २६ महिलांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. सात ते आठ दिवस प्रचाराचे काम केल्यास दिवसाला १,००० रुपये देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडून या महिला सकाळी सात वाजता साताऱ्यात पोहोचल्या. सकाळी सातपासून दुपारी दोन वाजेपर्यंत या महिला कुणाची तरी वाट पाहत बस स्थानकात थांबल्या होत्या. मात्र, ज्यांनी त्यांना बोलावले होते, त्यांनी फोन उचलणे बंद केले. दुपारपर्यंत ना जेवण मिळाले ना पाणी, अखेर सहनशक्ती संपलेल्या महिलांनी बस स्थानकातच आरडाओरड सुरू केली. "आम्ही गरीब आहोत, कामासाठी आलो होतो, पण आमची फसवणूक झाली," असे रडत रडत या महिलांनी सांगितले.
शिंदे गटाचा स्पष्ट नकार: 'आमचा संबंध नाही'
हा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) महिला पदाधिकारी विद्या बर्गे यांनी एसटी स्टँड गाठले. त्यांनी या महिलांची विचारपूस केली मात्र पक्षाची भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या: "या प्रकरणाशी शिवसेनेचा (एकनाथ शिंदे गट) कोणताही संबंध नाही. अज्ञात व्यक्तीने पक्षाचे नाव वापरून महिलांची फसवणूक केली असावी. आमच्या पक्षाची विनाकारण बदनामी करू नका."
प्रशासनासमोर अनेक प्रश्न
प्रचाराच्या नावाखाली महिलांना दुसऱ्या शहरातून आणून अशा प्रकारे बेवारस सोडणारा तो 'अज्ञात' इसम कोण? केवळ राजकारण तापवण्यासाठी हा प्रकार केला गेला की यामागे काही मोठे रॅकेट आहे? या महिलांना आता त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याची आणि न्याय देण्याची जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.