सातारा शहरातील खड्ड्यावरून सातारा पालिकेत शाब्दिक चकमक

अधिकारी काम करत नसल्याचा सुनील काळेकर यांचा आरोप

by Team Satara Today | published on : 24 June 2025


सातारा : सातारा नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी शहरातील खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सातारकरांचा वाहनावरून जाताना गंभीर अपघात होऊ शकतो. हे खड्डे तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी नगरसेवक सुनील काळेकर यांनी दिला आहे.एक महिन्यापूर्वी काळेकर यांनी सातारा शहरातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले होते. मात्र त्या आंदोलनाला पालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज पुन्हा काळेकर, ऍडवोकेट सचिन तिरोडकर, माजी नगरसेवक विजय काटवटे तसेच प्रभागातील नागरिकांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेतली आणि सातारा शहरात पडलेले खड्डे आणि शहरात रस्ते दुरुस्तीची झालेली दर्जाहीन कामे, दुर्लक्ष करणारे अधिकारी याबाबत तक्रार केली. यावरून एडवोकेट सचिन तिरोडकर व अभिजीत बापट यांच्यात खडाजंगी झाली. सातारा पालिकेने जे चांगले रस्ते केले त्याला अजूनही खड्डे पडलेले नाहीत, असे बापट यांनी सांगितले. सुनील काळेकर यांनी पंतांचा गोट येथे पोलीस मुख्यालयाकडून जाणार्‍या मार्गावर अडीच फुटाचा खड्डा पडल्याची तक्रार केली आणि बांधकाम विभागाच्या अभियंता घटनास्थळी फिरकत नसल्याची तक्रार केली. अधिकारी तुमच्या वेळेनुसार नाही तर त्यांच्या वेळेनुसार काम करतात, असे उत्तर बापट यांनी दिल्याने पुन्हा शाब्दिक चकमक झाली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सातार्‍याचे खड्डे कोल्ड मिक्स या साहित्याने भरून घेण्यात येतील, असे आश्वासन बापट यांनी देत नागरिकांना आश्वस्त केले. यावेळी सर्व नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी बापट यांना निवेदन सादर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना लवकरच मिळणार 1 रुपयात 20 लाखाचा अपघात विमा
पुढील बातमी
गायरान जमिनीतील पुनर्वसनाला आरफळ ग्रामस्थांचा विरोध

संबंधित बातम्या