सातारा : भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीने 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये सातारा जिल्ह्यातून पहिल्या यादीत सातारा विधानसभा मतदारसंघासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले, माण विधानसभा मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे, तर कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपला अनुकूल वातावरण असल्याचा सर्वेक्षणाचा कौल असल्याने भाजपने दगाफटका टाळण्यासाठी सेफ गेम खेळला असल्याची चर्चा आहे.
भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या उमेदवारी यादीची राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता होती. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघाची विशेष चर्चा होती, ज्यावर भारतीय जनता पार्टीची मजबूत पकड आहे. यामध्ये सातार्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच बाबाराजे समर्थकांनी सुरुची येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहर, तालुका आणि जावळी तालुक्यात संपर्क अभियान गतिमान केले आहे. माण व खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीला बॅकफूटवर ठेवले आहे. तसेच लोकसभा निवडणूकीमध्ये सुद्धा आमदार जयकुमार गोरे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठी आघाडी दिली होती. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय कार्यकारिणीने पुन्हा आमदार जयकुमार गोरे यांनाच संधी दिली आहे. गोरे यांच्या विरोधात तेथीलच ‘आमचं ठरलंय’ टीमच्या उमेदवारांची महाविकास आघाडी कडून घोषणा झालेली नाही. या आघाडीचे सर्व सदस्य राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले असल्याची माहिती मिळत आहे.
कराड दक्षिण मध्ये भाजपचे नेते अतुल भोसले यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मध्ये भाजपची चांगलीच ताकद दाखवली. खासदार उदयनराजे भोसले यांना येथून चांगले मताधिक्य मिळाले होते. अतुल भोसले यांची लढत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी होणार आहे. कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि पक्ष विस्तार यामध्ये अतुल भोसले यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. यावेळी ते विजय खेचून आणतील, असा विश्वास भाजपला आहे. या मतदार यादीवर नजर टाकली असता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे भाजपच्या उमेदवारांना दगाफटका होणार नाही, असे सेफ झोनमधील मतदारसंघ आधी जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे.