सातारा : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रथम दिलेल्या पर्यटन बंदीच्या आदेशाचा विपर्यास होवून पर्यटकांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सुमारे 60 टक्के पर्यटकांनी पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र सध्या सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यावर निसर्गाची मोठी कृपा आहे. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण याठिकाणी पहावयास मिळते. डोंगर, किल्ले, ठोसेघर-वजराईचे धबधबे, सडावाघापूरचा उलटा धबधबा, महाबळेश्वर, पाचगणी, वर्ल्ड हेरिटेज असलेले कास पुष्प पठार, अशा अनन्वित स्थळांसाठी सातारा जिल्हा हा प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच देश-विदेशातील पर्यटक हे पर्यटनासाठी सातारा जिल्ह्याला पसंती देतात. हेच पर्यटन शेकडो परिवारांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. हजारो पर्यटक पर्यटनस्थळी आल्याने स्थानिकांना रोजगार मिळून जातो. त्या-त्या परिसरातील पिके, खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर विकले जातात. त्यामुळे स्थानिकांच्याही घरची चूल पेटते.
पावसाळी पर्यटनाची काही आगळीच मजा असते. खास पावसाळी पर्यटनासाठी सहलींचे आयोजन करण्यात येते. त्यातल्या त्यात ठोसेघर, वजराई धबधबा, सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी अबालवृद्धांची तुफान गर्दी होत असते. त्यातल्या त्यात ठोसेघर धबधब्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून येथे पर्यटकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येते, असे दिसून येईल. ठिकठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गार्डस्, सीसीटीव्ही चा वॉच, पर्यटन गॅलरी, महिलांसाठी चेंजिंग रुम, टॉयलेट-बाथरुम, आराम करण्यासाठी प्रशस्त हॉल, मद्य प्राशन केलेल्या पर्यटकांना प्रवेश बंदी, धबधब्याचे नयनरम्य मनमोहक दृश्य पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी अशा नानाविध उपाययोजना सुरक्षित पर्यटनासाठी ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीने राबविलेल्या आहेत.
मात्र, दि. 19 जून रोजी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटकांवर निर्बंध रहावेत म्हणून पर्यटकांसाठी आदेश काढला. या आदेशामध्ये केवळ पर्यटकांनी सुरक्षितरित्या पर्यटनस्थळांचा आनंद लुटावा याबाबत काही अटी घालून दिल्या होत्या. हे आदेश 20 जून ते 19 ऑगस्ट 2025 पर्यंत लागू करण्यात आले होते. मात्र, समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या या बातम्यांमधून पर्यटकांनी ‘पर्यटन बंदी’ हा शब्द उचलला. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम पर्यटनावर झाला. पर्यटनस्थळांवरच बंदी घातली आहे, असे समजून पर्यटक पर्यटनस्थळी फिरकेनासे झाले. त्यामुळे उन्हाळी आणि वर्षा पर्यटनामुळे ज्यांची हातावरची पोटे भरत होती, त्यांच्यावरच संक्रांत आली. पर्यटकच नाहीत तर खाद्यपदार्थाचा आस्वाद घेणार कोण, यामुळे काहीजणाच्या चुली पेटेना झाल्या.
यानंतर दि. 20 रोजी जिल्हाधिकारी यांनी खास बैठक घेवून पुन्हा आदेश जारी केले. त्यानुसार पर्यटनावर बंदी नाही, फक्त सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पर्यटन करा, असे म्हटले आहे. या आदेशामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन पुन्हा बहरेल, आणि पुन्हा पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळतील, अशी अपेक्षा होती, ती पहिल्या आदेशाने फोल ठरली आहे.
सुमारे 60 टक्के पर्यटनावर परिणाम
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दि. 19 रोजी जे आदेश पारित केले, त्या आदेशात पर्यटन बंदी हा शब्द अनावधानाने आला होता. मात्र, त्याचाच धागा पकडून पर्यटक पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवीत आहेत. ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आम्ही ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देतो. असे असले तरी आदेशाचा परिणाम ठोसेघर येथील पर्यटनावर झाला आहे. सुमारे 60 टक्के पर्यटक कमी झाले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा विपर्यास न करता पर्यटकांनी ठोसेघरला अवश्य भेट द्यावी, त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना आम्ही पुरेपूर केलेल्या आहेत.
- प्रवीण चव्हाण,
व्यवस्थापक, ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती, ठोसेघर.