पाटणा : बिहारच्या सुप्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे निधन झाले. ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा अंशुमान सिन्हा यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. सिन्हा यांच्यावर पटनामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शारदा सिन्हा यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मनोज तिवारी यांनी दिली आहे. बुधवारी दुपारी शारदा सिन्हा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाटण्यात ठेवण्यात येणार आहे. येथे कुटुंब आणि उद्योग जगतातील लोक त्यांना निरोप देण्यासाठी येणार आहेत. शारदा सिन्हा यांच्यावर 7 नोव्हेंबरला सकाळी अंत्यसंस्कार होऊ शकतात. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. शारदा यांच्या हिट गाण्यांच्या क्लिप युजर्स शेअर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चित्रपट आणि संगीत जगताशी संबंधित लोकांनी शारदा यांच्या निधनाचे सर्वात मोठे नुकसान झाले असल्याचे वर्णन केले आहे.
अभिनेता सलमान खान यांच्या 'मैने प्यार किया' या पहिल्यावहिल्या चित्रपटातून 'कहे तोसे सजना' आणि 'गॅग्ज ऑफ वासेपूर' या गाजलेल्या चित्रपटातील 'तार बिजली से पतले हमारे पिया' या गाण्याला आपला आवाज देणाऱ्या बिहारच्या सुप्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा अत्यवस्थ होत्या. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पद्मश्री आणि पद्म भूषण या नागरी पुरस्कारांनी सन्मानित सिन्हा २५ ऑक्टोबरपासून आजारी होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल आस्थेवाईकपणे विचारपूस केली होती.