मुंबई : राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्याला महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली. मात्र या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात टोलेबाजीला सुरुवात झाली आहे.
या घोषणेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपरोधिक टीका केली. “एक बरं झालं की एका ठिकाणी ते मानसोपचार केंद्र काढत आहेत. त्याची खरंच गरज आहे. सर्वांसाठी नाही, बाकी सगळे हुशार आहेत; पण मानसोपचार केंद्र योग्य ठिकाणी सुरू करत आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. दरम्यान, या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एका वाक्यात प्रत्युत्तर दिले. “आम्ही मानसोपचारही करू आणि विरोधकांचा ताण-तणावही दूर करू,” असे शिंदे म्हणाले. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे निसर्गोपचार केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आल्याने जिल्ह्यातील आरोग्य व पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या घोषणेच्या पार्श्वभूमीवर दरेगाव आणि सातारा जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.सध्या या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध रंगताना दिसत आहे.