अंजली दमानिया यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी : रतन पाटील

by Team Satara Today | published on : 13 January 2025


सातारा : अंजली दमानिया यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना देण्यात आले.

निवेदनात रतन पाटील यांनी म्हटले आहे की, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या राज्यातील उपेक्षितांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहतात आणि त्यांच्यासाठी संघर्ष करतात. राज्य शासनाने त्यांना झेड प्लस किंवा समक्ष सुरक्षा पुरवावी, अशी महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांची मागणी आहे. अनिष्ट प्रवृत्तीचे पदाधिकारी, गुंड प्रवृत्तीचे लोक, वाळूमाफिया यांसारख्या दृष्ट प्रवृत्तींच्या विरोधात जाताना अनेकजण त्यांच्या कामामुळे दुखावले जाऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांकडून दमानिया यांच्या जीविताला धोका आहे. त्यांचा घातपात होऊ शकतो. बनावट, रचित अपघातामध्ये त्यांच्या जिवितास धोका पोहोचू शकतो.

नुकत्याच बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात दमानिया यांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे अशा लोकांकडून त्यांचा घातपात होण्याची शक्यता आहे. त्याकरिता त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी त्यांना झेड प्लस किंवा तत्सम सुरक्षा पुरवली जावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे रतन पाटील यांनी केली आहे.

हे निवेदन सातारा जिल्हा प्रशासनाकडून देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.

निवेदन देताना आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील, जिल्हा महासचिव निवृत्ती शिंदे, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सातारा सरचिटणीस नरेश देसाई, युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीस मनीषा साळुंखे, किरण पवार, संजय वाघमारे, आर्किटेक्ट धीरज पाटील, अमर देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी ग्रंथ वाचनातून येते
पुढील बातमी
सातारा शहराच्या पश्चिम भागात दोन दिवस पाणी नाही

संबंधित बातम्या