सातारा : सातार्यातून कारभार चालवून छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांनी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. त्यांनी मराठा साम्राज्याच्या पंतप्रधानपदी पेशव्यांची नियुक्ती केली. दिल्लीचा बादशहा मराठ्यांच्या इच्छेने व त्यांच्याच संरक्षणात गादीवर बसला. सातारा शहराची स्थापनाही याच शाहू महाराजांनी केली. त्यांच्या गौरवशाली कार्याला उचित न्याय देण्यासाठी सातारा पालिकेत नियोजित ठिकाणी थोरल्या छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक करावे, अशी मागणी मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे केली.
सातारा पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर असलेल्या दर्शनी भागातील पॅसेजमध्ये छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचा भव्य पुतळा उभारून उचित स्मारक करावे, यासाठी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अविनाश कदम, किशोर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, मावळा फौंडेशनचे सचिव नंदकुमार सावंत, इतिहास अभ्यासक राजूशेठ राजपुरोहित, नगर अभियंता दिलीप चिद्रे प्रमुख उपस्थित होते. सर्वांनी स्मारकाच्या नियोजित जागेची पाहणी करून चर्चा केली. यावेळी मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचा पुतळा सातार्यात असावा. सातारा पालिकेने त्यासाठी भूमिका घ्यावी. छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक उभारून त्यांच्या कार्याला न्याय मिळावा, अशी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सातारा पालिकेत प्रवेश केल्यानंतर असलेल्या प्रशस्त जागेत शाहू महाराजांचे भव्य स्मारक असावे. त्यांचा याठिकाणी पुतळा बसवावा. त्यासाठी जागा सुचवण्यात आली आहे. नगरपालिकेला प्रस्ताव दिला असून त्याला मंजुरी मिळेल, अशी आशा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सातारा शहराची स्थापना केली असली तरी मराठा साम्राज्याचा विस्तारही त्यांनी केला. पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्यापासून पुढील पेशव्यांची त्यांनी नियुक्ती केली. स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणार्या शाहू महाराजांच्या कार्याचा विचार करता त्यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही. त्यांचे कार्य लोकांपर्यंत जाण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. या चांगल्या कार्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना मावळा फौंडेशनच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित होते.
थोरल्या शाहू महाराजांचे कार्य गौरवास्पद आहे. नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय कार्यालयात त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी मावळा फौंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे. थोरल्या शाहू महाराजांचे स्मारक करण्यात येणार आहे.
- अभिजीत बापट
मुख्याधिकारी, सातारा.