नवी मुंबईच्या आशा फाऊंडेशनच्या आशा गौरव पुरस्कारांची साताऱ्यात घोषणा : नामनिर्देशन पाठवण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 25 February 2026


सातारा  :  महिला सशक्तीकरण, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'एकल पालक व अनाथ मुली व महिलांचा ' गौरव करण्यासाठी 'आशा फाऊंडेशन, नवी मुंबई' तर्फे यंदा प्रथमच “आशा गौरव पुरस्कार” आयोजित करण्यात येत आहे. निवडीचे निकष पूर्ण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पात्र एकल पालक व अनाथ मुली व महिलांची नावे संस्थेकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने दि. ८ मार्च २०२६ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण विकास, उद्योजकता, पर्यावरण, क्रीडा आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकल पालक व अनाथ मुलींना 'आशा तेजस्विनी' या पुरस्काराने तसेच ज्या महिलांनी आपल्या बालपणी आई-वडील अथवा दोघांचेही छत्र हरपल्यावरही समाजात स्वतःला सिद्ध केले आहे अशा महिलांना 'आशा स्वयंसिद्धा' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

'आशा फाऊंडेशन' ही संस्था अनाथ व एकल पालक मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून आतापर्यंत सातारा व रायगड जिल्ह्यांमधील ४,००० पेक्षा अधिक मुलींपर्यन्त  सेवा पोहोचली आहे. महिलांच्या कार्याला योग्य मंच मिळावा व त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून समाजात सकारात्मक बदल घडावा, या उद्देशाने हा पुरस्कार उपक्रम राबविण्यात येत आहे.

निवडीचे निकष - आशा तेजस्विनी पुरस्कार - मुलगी एकल पालक किंवा अनाथ असावी, वय वर्षे १० ते २१ , इयत्ता ५ वी ते पदवी शिकत असावी

आशा स्वयंसिद्धा पुरस्कार - बालपणी आई किंवा वडील अथवा दोघांचेही छत्र हरपलेल्या महिला, वय वर्षे २४ वरील, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान असलेल्या महिला

नामनिर्देशनासाठी आवाहन - वरील निवडीचे निकष पूर्ण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पात्र एकल पालक व अनाथ मुली व महिलांची नावे संस्थेकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नामनिर्देशन पाठविण्याची अंतिम तारीख: १ मार्च २०२६

संपर्क: +91 8356845528 / +91 9067109423

समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या एकल पालक व अनाथ मुली व महिलांचा सन्मान करण्यासाठी सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालये व सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन पाठवावे, असे आवाहन आशा फाऊंडेशनतर्फे करण्यात येत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक; कराड न्यायालयाने दिली दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी
पुढील बातमी
पत्र मिळताच आंदोलन स्थगित करू – डॉ. भारत पाटणकर; मार्चच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनावर निर्णायक बैठक होणार

संबंधित बातम्या