उत्तर पेशवाईत लोकांना रिझवण्याचे आणि करमणुकीचे साधन म्हणून तमाशा उदयास आला. खर्या अर्थाने उत्तर पेशवाईमध्ये तमाशाला राजाश्रय मिळाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजही तमाशा हा कलाप्रकार जोपासला जातोय, त्याला लोकाश्रय मिळतोय, हेही नसे थोडके.
पेशवाईतील शाहीर राम जोशी, अनंत फंदी, पांडुरंग खाडिलकर, सगणभाऊ, अलिकडच्या काळातील ज्यांना तमाशा शिरोमणी संबोधले जाते ते पठ्ठे बापूराव, अण्णाभाऊ साठे अशा कितीतरी शाहीरांनी गण-गवळणी, लावण्या, छक्कड, अभंग लिहून महाराष्ट्रातील तत्कालीन कलाविश्व समृद्ध केले. परंतू काही शाहीर काळाच्या ओघात नामशेष झाले. जळणे हा कापुराचा गुणधर्म आहे. एखादी गोष्ट जळाल्यानंतर राखेच्या स्वरुपात त्याचे अस्तित्व टिकून राहते. परंतू कापराच्या बाबतीत मात्र नेमके उलटे आहे. जळाल्यानंतर त्याचे अस्तित्वच संपुष्टात येते. मात्र, जळालेल्या सुगंधाच्या स्मृती अनेकांच्या स्मरणात राहतातही. कालांतराने त्याही विस्मृतीत जातात. असाच कापराप्रमाणे जळणारा एक शाहीर सातार्याच्या मातीमध्ये जन्मास आला. भाऊ मालोजी भंडारे उर्फ भाऊ फक्कड.
सातारच्या पाटण तालुक्यातील हुंबरणे या गावामध्ये साधारणत: 1890 च्या सुमारास त्यांचा जन्म झाला. शिक्षण इंटरपर्यंतचे. त्या काळातील समकालीन शाहिरांपेक्षा ते तसूभर अधिकच म्हणायचे. साधारणत: किशोर वयात असताना शेजारी असणार्या मंद्रुळकोळे गावाच्या जत्रेमध्ये तमाशा सम्राट काळू-बाळू यांचे आजोबा हिरा-सातू कवलापूरकर यांचा तमाशा बघितला, हिरा-सातू कवलापूरकर (तुरेवाले) आणि तात्याबा पेटकर (कलगीवाले) यांच्यातल्या कलगीतुर्याचा अटीतटीचा सामना बघितला आणि यानंतरच त्यांनी तमाशामध्ये काम करण्याचा आणि कलेला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. तमाशा विश्वामध्ये नाच असो, गण-गवळण असो, छक्कड असो, यामध्ये भाऊ मालोजी भंडारे हे नाव महाराष्ट्रभर गाजत होते. हिरा-सातू कवलापूरकर यांच्या तमाशातील एक चमकता तारा म्हणून भाऊ भंडारे पुढे आले होते. भाऊंचे कलेवरील प्रभुत्व बघून हिरा-सातू यांनी भाऊ ला ‘फक्कड’ हे नाव दिले आणि इथून पुढे भाऊ फक्कड हे नाव तमाशा विश्वामध्ये रुढ झाले.
सुमारे 70 वर्षांपूर्वी म्हणजेच 1950 साली लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्यावर राजा नेने दिग्दर्शित पठ्ठे बापूराव हा चित्रपट काढण्यात आला होता. म्हणजे पठ्ठे बापूरावांच्या निधनानंतर केवळ पाचच वर्षात या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. यानंतर लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्यावर अनेक चित्रपट निघाले व काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यामध्ये प्रसाद ओक, अमृता खानविलकर यांचा अभिनय असलेला चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असूनि सोवळे ठेवले घालूनी घडी। हाती घेतली मशाल तमाशाची, लाज लाविली देशोधडी॥ असे म्हणत लोकशाहीर पठ्ठे बापूरावांनी तमाशा या लोककलेला सुवर्णयुग दाखवले होते.
तत्कालीन दक्षिण सातारा येथील, वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष हे श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी उर्फ शाहीर पठ्ठे बापूराव यांचे गाव. घरामध्ये कुबेराला लाजवेल असे ऐश्वर्य असतानाही पठ्ठे बापूरावांनी मात्र वेगळा मार्ग चोखाळला. शाहीर पठ्ठे बापूराव व पवळा ही नर्तकी जोडी महाराष्ट्रात कमालीची प्रसिद्ध झालेली होती. मुंबईतील ‘पीला हाऊस’ या तमाशा थेटरामध्ये या उभयतांचे शो अक्षरश: हाऊसफुल्ल व्हायचे. तिकिटबारीवर तिकीट मिळविण्याच्या वादातून अक्षरश: खूनही पडले होते, असे जाणकार सांगतात. अर्थात त्या काळामध्ये मनोरंजनाची साधने मर्यादित होती. चित्रपट निर्मिती नसल्याने ते प्रदर्शित करणारे थेटर असण्याचा प्रश्नच नव्हता. पोटा-पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी देशावरुन मुंबईला गेलेले चाकरमानी आणि मुंबईतील उच्चभ्रू हे तमाशाचे प्रेक्षक. त्या काळामध्ये तमासगिरांचा रुतबा आताच्या बॉलिवूडमधील सिनेस्टारपेक्षा कमी नव्हता. कलगीतुर्यामध्ये पठ्ठे बापूरावांचा पराभव करण्याचे स्वप्न बघणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार होता.
1890-1920 हा तमाशा युगाचा सुवर्णकाळ होता आणि या सुवर्णकाळातच एकिकडे पठ्ठे बापूराव तळपत असतानाच पूर्वेला मात्र भाऊ फक्कड नावाचा सुर्योदय होत होता. दोघेही प्रतिभासंपन्न शाहीर. तमासगीर असूनही गण-गवळण, लावण्या यांच्या स्वत: रचना करणे, त्यांना चाली लावणे आणि स्वत: फडात गावून सादर करणे. वग असोत किंवा कलगीतुरा, शह-काटशह देणारे म्हणून भाऊ फक्कड व पठ्ठे बापूरावांचा लौकिक वाढत चाललेला होता. शेवटी तलवारीला तलवार भिडतेच. भाऊ फक्कड व पठ्ठे बापूरावांचा सामना झाला पाहिजे, अशी मागणी मुंबईतील अनेक रसिक करु लागले होते. मुंबईतील छोटु भाईंच्या पीला हाऊस मध्ये हा अटीतटीचा सामना व्हावा म्हणून अनेकांनी छोटु भाईंकडे गळ घातली होती.
1920 सालचा हा तमाशा क्षेत्रातील अद्वितीय सामना पाहण्यासाठी अनेकांनी खेळाची तिकिटे बुक केली होती. आठवडाभर अगोदरच या खेळाची सगळी तिकिटे संपलेली होती. भाऊ फक्कड हे तुरा पक्षाचे, तर बापुराव कलगी. प्रत्यक्षात दिवस उघडला आणि दक्षिण मुंबईतील पीला हाऊस मध्ये हा सामना सुरु झाला. पठ्ठे बापूरावांच्या जोडीला पवळा, तर भाऊंच्या जोडीला भांगरी नावाची नर्तकी. सामना सुरु झाला. पहिला सवाल विचारण्याचा मान कलगी पक्षाला मिळाला. ‘शुभ मंगल चरणी गण नाचला, नाचला कसा तरी पाहू, चला गडे। उगळा, निगळा, मनोवेगळा खोचला, गणपती नाचून गेल्यापाठी । शेंदूर ठेवला कोणासाठी? ऽऽऽ’, असा गूढ सवाल बापूरावांनी करताच भाऊ फक्कड जवाब देण्यास सरसावले. त्यांनीही शेरास सव्वाशेर असा गणातूनच जवाब दिला. ‘‘आज पूजूया आधी गण रंगणा। रंगला कसा भव भय भंगना ऽऽऽऽ------ गणपती नाचूनी गेल्यावरती । शेंदूर वाहू ‘एकाक्षिणी’ प्रती । फक्कड भाऊराव कवीची धरती... कडकड... धडधड... घडी पलघडीची... चाल नडीची... चढाओढीची... बुटी जरीची... हाती बावण वीर कंगणा, असे फक्कड भाऊंनी बापूरावांच्या सवालास सणसणीत उत्तर दिले. फक्कड भाऊंच्या या सणसणीत प्रत्युत्तरामुळे पठ्ठे बापूराव मात्र गांगरले. एवढा शीघ्र कवी त्यांनी आजपर्यंत पाहिलेला नव्हता. गण झाल्यानंतर पठ्ठ्यांनी पहिला सवाल टाकला. ‘‘पहिला सवाल करावा वाटतो । क्षुद्र शाहिरा असा हवा । कोणता जिन्नस रोज उगवितो । धरणीवरी या नित्य नवा ॥ आता मात्र पठ्ठे बापूराव फक्कड भाऊंच्या जातीवरती उतरले होते. क्षुद्र म्हणून त्यांनी भाऊंना हिणवले होते. परंतू भाऊही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. हातात डफ घेवून वीज कडकडावी, अशा त्वेषाने भाऊंनी प्रत्युत्तर दिले. ‘‘ तो उगवितो या धरणीच्या वरी... म्हंजे आकाशी, म्हंजे निरंतर नित्य नवा उगवत असतो तो काळ सकाळ... दुपार... संध्याकाळ... रात्र रजनी हे जिन्नस रोज नित्यनवे उगवतात ताजे-ताजे काय श्रेष्ठ भूदेवा? यात काही चुकले का माझे?’’ फक्कड भाऊंच्या या खणखणीत प्रत्युत्तरामुळे मात्र पठ्ठे बापूरावांच्या मात्र अंगाची लाहीलाही झाली. कोण कुठला दीड दमडीचा शाहीर आणि मला असे प्रत्युत्तर देतो, असे म्हणत पठ्ठेंनी दातओठ खाल्ले आणि रागारागातच सवाल केला. ‘‘वेद ऐकणे निशिद्ध तुजला... कसा सांगशील तू हे शिंदळीच्या...ऽऽऽ । एकूण वेद किती? कोणत्या कुळीत ते कसे जन्मले?ऽऽऽ ना तरी पायी लाग माझ्या... ताटू नको रे फुसकीच्या... हा हा रं जी रं जी॥ ऽऽऽऽ, असे म्हणत पुन्हा पठ्ठ्यांनी भाऊंच्या जातीवरुन त्यांचा उद्धार केला. खरेतर अशा प्रकारची रचना आणि सवाल पठ्ठे बापूरावांसारख्या लोकशाहीराला शोभत नव्हती. भाऊच काय, परंतू समोर बसलेल्या रसिकांच्याही ते लक्षात येत होते. परंतू पठ्ठे बापूरावही इरीस पेटलेले होते. काहीही करुन बोर्डावरच भाऊ फक्कड ला नाक रगडायला लावायचे, असा इरादा पठ्ठ्यांनी केलेला होता. परंतू जातीयतेचे चटके सोसलेल्या भाऊंना त्याचा काहीच फरक पडलेला नव्हता. परंतू पठ्ठे बापूरावांसारख्या विद्वान शाहिराला ही भाषा न शोभणारी होती. हिरा-सातूच्या भट्टीमध्ये तावून सुलाखून निघालेला भाऊही काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. तोही पठ्ठ्यांच्या एक पाऊल पुढे होता.
तेव्हा भाऊ म्हणतात, ‘‘तुमचं तरी सोवळं कुठं ठिकाणावर हाये? हे कलियुग आहे. त्यामुळं क्षुद्रानं सांगावं, ब्राह्मणानं ऐकावं, घडणार कलीमधी ही सत्यकथा... घमेंड करु नको ब्राह्मणा’’, खरंतर भाऊंनी दिलेले उत्तर हे खूप मोठे आहे. याठिकाणी याचा उल्लेख नाईलाजाने टाळावा लागत आहे. परंतू भाऊंच्या या उत्तराने सारे थेटर टाळ्या आणि शिट्ट्यांनी दुमदुमून गेले. यानंतर दोघांकडूनही अनेक सवाल-जवाब झाले. पवळा आणि भांगरीच्या नृत्याने प्रेक्षकांनी अक्षरश: थेटर डोक्यावर घेतले. शेवटी, फक्कड भाऊंनी अतिशय अवघड सवाल टाकला. ‘‘सात शिरांचा नर । तुला विचारतो खरं। आज सांग बरोबर । आज पाहू तुझं लक्षणऽऽऽ ॥ एका पिंडाला सात शिरं । द्यावे सांगून त्याच पिंडाला आठ हात । द्यावे सांगून त्याच पिंडाला चार स्तने । द्यावे सांगून त्याच पिंडाला पाच शेपटे । द्यावे सांगून हां जी रं रं जी जी । आज पाहू तुझं लक्षण ॥ भाऊंच्या या अस्सल फक्कड सवालामुळे मात्र पठ्ठ्यांची पंचाईत झाली. याला नक्की उत्तर काय द्यावे, असा प्रश्न पठ्ठे बापुरावांना पडला. भाऊंनी केलेला सवाल गूढ होता. त्याचे कोडे उमजत नव्हते. खरेतर पठ्ठे बापूराव भाऊंपेक्षा किमान वीस वर्षांनी थोरले होते, त्यांचा अनुभव मोठा होता. मात्र वयाने धाकटे असणार्या भाऊंनी मात्र त्यांना निरुत्तर केले. भाऊंच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पठ्ठ्यांनी 14 दिवसांची मुदत मागितली. 14 दिवसानंतर पुन्हा पीला हाऊसमध्ये थेटर भरले. प्रेक्षकांनी-रसिकांनी थेटर अक्षरश: उतू गेले होते. जर भाऊने त्यानेच केलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले तर मी त्यांना दोनशे रुपये रोख व माझ्या डोईवरील जरीचा मंदील बक्षीस देईन आणि हरलो म्हणून मंदीलच काय, साधी टोपीही पुढील 14 दिवस डोक्यावर घालणार नाही, अशी प्रतिज्ञा तुडूंब भरलेल्या थेटरामधील रसिकांसमोरच केली. शेवटी स्वत: टाकलेल्या सवालाचा जवाबही भाऊंनी दिला.
एका पिंडाला सात शिरं... म्हणजे पिंडातील सप्त धातू... समजलं?
त्याच पिंडाला पाय बावीस... म्हणजे पिंडाच्या कण्याच्या मणक्याचे एकवीस मणी... आणि बावीसावे मस्तक... कसं समजलं?
त्याच पिंडाला आठ हात म्हणजे... अष्ट पाकळुका ।
माझ्या विद्वान ब्राह्मण स्पर्धकाला अधिक विस्तृत करुन सांगणे न लगे, समजलं?
त्या पिंडाला चार स्तने... अजब? म्हणजे चार देह सुक्ष्म, स्थुळ, कारण, महाकारण... समजलं?
त्याच पिंडाला पाच शेपटे अवयव?
म्हणजे पाच तत्वे... आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश... कसं... समजलं?
भाऊंच्या या उत्तराने पठ्ठे बापूराव मोठ्याने हाळी दिली आणि होऽऽऽ समजलं, असं म्हणून बापूरावांनी पराभव स्विकारला. पठ्ठे बापूरावांना हरवल्यानंतर प्रेक्षकांनी भाऊंना अक्षरश: डोक्यावर घेतले. टाळ्या-शिट्ट्यांनी आणि शेले भिरकवण्याने थेटर दुमदुमून गेले. भाऊ फक्कड-भांगरीच्या जोडीने पठ्ठे बापूराव-पवळाला हरवले होते. शेवटी पठ्ठे बापूरावांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या डोईवरील जरीचा मंदील भाऊंच्या डोईवर चढवला. रोख दोनशे रुपये दिले आणि पुढील 14 दिवस त्यांनी डोक्यावर मंदील वा पटकाही चढवला नाही.
भाऊंच्या या कर्तबगारीमुळे महाराष्ट्रभर त्यांचा एकच लौकिक झाला. पठ्ठे बापूरावांसारख्या नावाजलेल्या शाहीराला हरवून भाऊ फक्कड शाहिरांचे शाहीर झाले. तमाशा क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा लौकिक झाला. परंतू पठ्ठे बापूरावांना हरवणारा हा शाहिरांचा शाहीर मात्र उपेक्षितच राहिला. पठ्ठे बापूरावांचे लिखित असे साहित्य क्वचितच उपलब्ध आहे. त्यांनी रचलेल्या लावण्या, छक्कड, गण-गवळणी, वग नाट्य, इतकेच काय अभंगही लिखित स्वरुपात नाहीत. तमाशातील काही कलावंत आहेत, त्यांच्या पिढ्या दर पिढ्यांमध्ये भाऊ फक्कडांची वरील रचना मुखोद्गत असल्यानेच ते आजपर्यंत जिवंत आहेत.
पूर्वी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील दिवंगत प्राध्यापक डॉ. कृष्णा किरवले यांच्या दलित चळवळ आणि साहित्य व आंबेडकर शाहीरी या पुस्तकांमध्ये भाऊ फक्कड यांच्याबद्दल विस्तृतपणे लिहिण्यात आले आहे. त्यानंतर पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पांडुरंग जगन्नाथ येवळे यांनी ‘शाहिरांचे शाहीर : भाऊ फक्कड’ हे छोटेखाणी पुस्तक प्रकाशित करुन त्यांच्या जिवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो प्रयत्न पुरेसा म्हणता येणार नाही. भाऊ फक्कड यांचे जीवन व त्यांच्या साहित्यावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. सातारच्या मातीमध्ये अनेक नामांकित लोकशाहिरांनी जन्म घेतला. यामध्ये पठ्ठे बापूराव, भाऊ मालोजी भंडारे उर्फ भाऊ फक्कड, अण्णाभाऊ साठे यांना नामोल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल. शाहिरांनी त्या-त्या काळामध्ये उपलब्ध परिस्थितीनुसार समाजाला रिझवण्याचे आणि प्रबोधनाचेही मोठे कार्य केले.
वाजे घुंगरु रुमझुम झुम । वाजे घुंगरु रुमझुम झुम ।
छनाना छुम... छनाना छुम... छनाना छुम बाजे ॥
अशा गाण्यावर भाऊ गात होते आणि भांगरी तळपत्या विजेच्या तेजाप्रमाणे बोर्डावर नृत्य करीत होती. हे गाणे ऐकून बाजूलाच राहत असणारे बालगंधर्व तमाशाच्या कनातीत घुसले. अर्थात हा तमाशा पुण्यात सुरु होता. हे गाणे ऐकल्यानंतर स्वत: बालगंधर्व मंत्रमुग्ध झाले. ‘काय गाता? तुमचा आवाज स्वर्गीय आहे’, असे म्हणत बालगंधर्वांनी भाऊंना कडकडून मिठी मारली. यावेळी बालगंधर्वांनी बाजाची पेटी, भरजरी मांदील आणि काही वस्त्रालंकार भेट म्हणून दिले. भाऊंचा लौकिक वाढत असतानाच त्यांना तमाशाचा वीट आला. अशा काळातच ते आता अभंगही रचू लागले, कीर्तन करु लागले. त्यांचे कीर्तन ऐकून त्या काळातील प्रवचनकार हभप भांडाकर बुवांनी त्यांचे तोंडभरुन कौतुक केले.
इंटरपर्यंत शिकलेल्या भाऊ फक्कडांना एखादी चांगली नोकरी मिळू शकली असती, समाजामध्ये मानमरातब मिळाला असता. परंतू भाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य लोककलेमध्ये व्यतित केले. काही काळ मिरजमध्ये त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही सहवास लाभला होता. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही अनेक पोवाडे लिहिले. ‘माझ्या जातीतील एक विलायतेत शिकलेला पुढारी समाजोत्थानाचे काम करतोय’ याचा त्यांना अभिमान होता. एवढेच काय, भाऊंनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्यावरही पोवाडे रचले. शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतानाच तमाशा आणि पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले होते. 1925 साली डॉ. बाबासाहेब कोर्टाच्या कामानिमित्त सांगलीला आले असताना भाऊ फक्कड त्यांना भेटले. तेथील तीरमारे मास्तरांनी बाबासाहेबांना भाऊंबद्दल सर्व माहिती दिली. यावेळी भाऊंनी आपला तमाशा पाहण्याची गळ त्यांना घातली होती. परंतू नंतर कधीतरी आलो तर नक्की पाहीन, असे आश्वासनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाऊंना दिले होते. बाबासाहेबांच्या भेटीमुळे भाऊंमध्ये एक चेतना निर्माण झाली. दलित चळवळीच्या उद्धारासाठी भाऊंनी पारंपारिक शाहिरीचा भेदक वापर करुन समाज चेतवण्याचे काम केले. राज्यभर तमाशाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजकार्य लोकांना समजून सांगण्याचे काम भाऊंनी केले. त्यांचे हे कार्य बघून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बहिष्कृत हितकारीणी सभेच्या कार्यकारिणी मंडळावर सभासद म्हणून घेतले होते.
काही वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा कामानिमित्त सांगलीला आले. त्यावेही तीरमारे मास्तरांना बोलावून भाऊंचा तमाशा बघायचा आहे, असा मानस बोलून दाखवला. परंतू त्या अगोदरच क्षयाच्या रोगाने (1942) भाऊंचा मृत्यू झाला होता. हे ऐकून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खूप वाईट वाटले. शाहिरांच्या शाहिराचा अशा पद्धतीने शेवट व्हावा, हे बाबासाहेबांच्या मनाला चटका लावून गेले.
राजर्षी राजश्री शाहू महाराज असोत, किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या महान विभूतींना भेटण्याचा योग भाऊ फक्कडांना आला. छत्रपती शाहू महाराज हे कलाकारांचे आश्रयदाते होते. पठ्ठे बापूरावांप्रमाणे भाऊ फक्कडांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली होती. यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी भाऊ फक्कडांना बोलावून आपल्या दरबारामध्ये तमाशा सादर करण्याची विनंती केली होती. गण झाल्यानंतर त्यांनी वगनाट्याला सुरुवात केली. या वगनाट्यामध्ये त्यांनी चक्क महाराजांचेच सोंग घेतले होते. परंतू सोंग घेवून कला सादर करणार्या भाऊला क्षमा करावी, अशी भाऊ फक्कडांनी विनंती केल्यानंतर महाराजांनी फक्कडच्या पाठीवर थाप टाकून आपल्या गळ्यातील मोत्यांच्या माळा त्यांना भेट केल्या. यानंतर राजश्री शाहू महाराजांनी सत्यशोधकी समाजासाठी भाऊंकडून काही रचना करुन घेतल्या. भाऊ फक्कडांना वग सम्राट ही पदवीही शाहू महाराजांनी दिलेली होती.
पठ्ठे बापूरावांनी ‘मुंबई गं नगरी बडी बांका... जशी रावणाची दुसरी लंका... वाजतो गं डंका... पवळे जपून चाल... घाईघाईत होतील हाल... धर हात सावरी तोल, हा पठ्ठे बापूचा बोल... अगं ही मुंबई... पाहिली मुंबई (संक्षिप्त). त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनीही मुंबईवर लावणी लिहिली. ती लावणी अशी, मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी । कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती-- हातगाडी हमालांची भारी गडबड खटार्यांची... धडपड इथं वाहतुकीची रिघ लागती